अनेक वर्ष क्रिकेटवर राज्य करणाऱ्या विराट कोहलीने आज (12 मे) कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. (Virat Kohli Retired From Test Cricket) अलिकडेच रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता विराटही कसोटीतून निवृत्त झाला. त्यामुळे भारतीय संघाला एकापाठोपाठ दुसरा धक्का बसला. चला तर मग या बातमीद्वारे आपण विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर एक नजर टाकूया.
विराट कोहलीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी 2011 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान विराटने 210 डावात 46.85च्या सरासरीने फलंदाजी करताना 9,230 धावा केल्या आहेत. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 राहिली आहे. कसोटीमध्ये त्याने 31 अर्धशतकांसह 30 शतके आणि 7 द्विशतके झळकावली आहेत.
विराटने गेल्या वर्षीच भारताने टी20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकल्यानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो कसोटीतूही निवृत्त झाला. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असेल. यादरम्यान भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आता भारतीय संघ कमी अनुभवी खेळाडूंसह इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. विराटचा फिटनेस पाहता तो भारतासाठी आणखी बराच काळ कसोटी खेळू शकला असता.





