भारताचा १९ वर्षांखालील संघ (U19 team India) १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या (U19 World Cup) अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. ५ फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंडचे १९ वर्षाखालील संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असतील. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला ९६ धावांनी मात देऊन भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. शनिवारी (५ फेब्रुवारी) होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी वरिष्ठ भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने युवा संघाला मार्गदर्शन केले आहे.
भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा एक भाग असलेल्या कौशल तांबेने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कौशल तांबे आणि विराट यांच्यात झालेला व्हिडिओ कॉल दिसत आहे. तांबेने फोटेच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, अंतिम सामन्याच्या आधी काही महत्वाचे इनपुट घेता आले. तांबेने विराटला ‘GOAT’ (greatest of all time) म्हणतेच सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडू अशी उपमा दिली आहे.
कौशल तांबेव्यतिरिक्त १९ वर्षाखालील संघाचा खेळाडू राजवर्धन हंगरगेकरनेही त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट खेळाडूंसोबत संवाद साधताना दिसत आहे. राजवर्धनने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘विराट भैय्या तुमच्यासोबत चर्चा करून खूप चांगले वाटले. तुमच्याकडून क्रिकेट आणि आयुष्याविषयी खूप काही शिकायला मिळाले, ज्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळात चांगले प्रदर्शन करण्यासाठी मदत मिळेल.’
विराटने भारताच्या युवा संघातील या दोन खेळाडूंव्यतिरिक्त प्रत्येक खेळाडूसोबतच चर्चा केली आहे. दरम्यान, विराटने स्वतः संघाचे नेतृत्व करताना १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाने विराटच्या नेतृत्त्वाखाली २००८ साली १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक जिंकल्यानंतर विराटला स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली आणि भारताच्या मुख्य संघातही त्याने स्वतःचे स्थान बनवले.
दरम्यान, विराटकडून मार्गदर्शन मिळण्यापूर्वी भारताच्या या युवा खेळाडूंना अनुभवी रोहित शर्माकडूनही मार्गदर्शन मिळाले आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि भारताचा युवा संघ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत एकत्र होते. त्यावेळी रोहितने युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते.
१९ वर्षाखालील भारतीय संघाला शनिवारी (५ फेब्रुवारी) इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघासोबत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळायचा आहे. भारताना यापूर्वी चार वेळा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे आणि आता पाचव्या ट्रॉफीवर संघाची नजर आहे.
महत्वाच्या बातम्या –
धोनीमुळे घडला ‘सलामीवीर’ रोहित, आता रोहितमुळे घडणार ‘हा’ फलंदाज; विंडीजविरुद्ध मिळणार नवी जबाबदारी
कॅरेबियन असूनही विवेकानंदांचे पुस्तक हाती घेत गेलने दाखवले भारतावरचे प्रेम, फोटो तुफान व्हायरल