---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धचा पराभव कॅप्टन कोहलीसाठी दुर्दैवी, अंतिम सामन्यात पोहोचून ‘इतक्यांदा’ गमावलाय चषक

On: गुरूवार, जून 24, 2021 8:07 AM
Virat-Kohli-and-Ajinkya-Rahane
---Advertisement---

साउथम्पटन| बुधवार रोजी (२३ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना पार पडला. या ऐतिहासिक सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांच्या शानदार भागिदारीने भारताला विजयाचा स्वाद चाखू दिला नाही. यासह भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर अजून एका पराभवाची नोंद झाली आहे.

शेवटच्या डावात भारताने न्यूझीलंडला विजयासाठी केवळ १३९ धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामी जोडीचा भारतीय गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने अवघ्या ९ धावांवर टॉम लॅथमला माघारी धाडले. तर डेवॉन कॉनवेलाही १९ धावांवर पायचित केले. परंतु कर्णधार विलियम्सन (नाबाद ५२ धावा) आणि अनुभवी टेलरच्या (नाबाद ४७ धावा) जोडीला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. परिणामी न्यूझीलंडने ४५.५ षटकांत ८ विकेट्स राखून सामना खिशात घातला.

न्यूझीलंडच्या हातून पराभूत होताच कर्णधार विराट आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २ वेळा पराभूत होणारा दुसराच कर्णधार ठरला आहे. या नकोशा विक्रमाबाबतीत त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीची बरोबरी केली आहे. यापुर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्येही विराटच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. परंतु महत्त्वपुर्ण अशा अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने १८० धावांनी भारतावर मात केली होती.

विराटपुर्वी माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नेतृत्त्वातही भारतीय संघाने अंतिम टप्प्यावर आल्यानंतर आयसीसी चषक गमावला होता.  चॅम्पियन्स ट्रॉफी २००० आणि विश्वचषक २००३ यांचा यात समावेश होतो. तसेच भारताला विश्वविजेता बनवणारा कर्णधार एमएस धोनी याच्यावरही २०१४ मध्ये पराभवाची नामुष्की ओढावली होती. त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१४ मध्ये भारताने अंतिम सामन्यात पोहोचूनही टी२० विश्वचषक गमावला होता.

अशाप्रकारे आतापर्यंत तब्बल ५ वेळा भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर पराभवाचे तोंड पाहिले आहे. यासह सर्वाधिक वेळा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावण्याचा नकोसा विक्रमही भारतीय संघाच्या नावावर जमा झाला आहे. याबाबतीत इंग्लंड संघ अव्वलस्थानी आहे. त्यांनी सर्वाधिक ६ वेळा आयसीसी चषक गमावला आहे. त्यानंतर ५ पराभवांसह भारतीय संघाचा क्रमांक लागतो.

याखेरीज कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतरही सर्वाधिक आयसीसी चषक पटकावण्याच्या बाबतीत भारत न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. ही न्यूझीलंड संघाची कोणती आयसीसी स्पर्धा जिंकण्याची केवळ दुसरी वेळ होती. तर भारतीय संघाने आतापर्यंत तब्बल ५ आयसीसी चषक जिंकले आहेत. याबाबतीत ऑस्ट्रेलिया संघ सर्वाधिक ७ चषकांसह या यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टेलरचा विजयी चौकार अन् न्यूझीलंडचा जल्लोष, वॉटलिंगची निवृत्ती; WTC फायनलचे भावूक करणारे अंतिम क्षण

पदार्पणापासूनच भारताला नडणाऱ्या जेमिसनची ‘अशी’ राहिली कसोटी चॅम्पियनशीमधील कामगिरी

स्मिथची सावली मानल्या जाणाऱ्या लॅब्युशेनने गाजवली अख्खी ‘टेस्ट चॅम्पियनशिप’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---