भारतीय संघ सध्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या संघात इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे. त्रयस्थ ठिकाणी हा सामना खेळवला जाणार असल्याने भारतीय संघासमोर प्रतिकूल वातावरण असलेल्या परदेशी खेळपट्टीवर विजय मिळवण्याचे आव्हान आहे.
खरंतर पूर्वी परदेशी खेळपट्ट्यांवर आणि परदेशी वातावरणात भारतीय संघाला कसोटी सामना जिंकणे, अवघड मानले जायचे. मात्र आता ही परिस्थिती बदललेली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०१५ सालापासून परदेशी वातावरणात देखील दमदार कामगिरी केली आहे.
आकडेवारी देते आहे साक्ष
भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना ८९ वर्षांपूर्वी १९३२ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्डसच्या मैदानावर खेळला होता. त्यानंतर १९७०च्या दशकात भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकायला सुरुवात केली. मात्र त्यांची परदेशातील विजयाची टक्केवारी यथातथाच होती. आपल्या कसोटी इतिहासाच्या पहिल्या ६७ वर्षांत भारतीय संघाची परदेशी खेळपट्ट्यांवरील आकडेवारी अतिशय खराब होती. १९३२ ते १९९९ या काळात भारतीय संघाने परदेशात खेळलेल्या १५५ पैकी केवळ १३ कसोटी सामने जिंकले होते.
गांगुलीच्या काळात झाला बदल
सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर हे चित्र बदलू लागले. भारतीय संघाने आत्तापर्यंत परदेशात ५३ कसोटी सामने जिंकले आहेत, त्यातील ४० सामने २००० सालानंतर जिंकले आहेत. या काळात कोहलीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. कोहली २०१४ सालच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त झाला. त्यानंतर २०१५ सालानंतर भारतीय संघाने परदेशात ३२ पैकी १५ कसोटी सामने जिंकले आहेत. यात श्रीलंकेत ५, वेस्ट इंडिज मध्ये ४, ऑस्ट्रेलियात ४ तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येकी एका कसोटी विजयाचा समावेश आहे.
कोहली सर्वाधिक यशस्वी कर्णधार
भारतीय संघाने २००० सालानंतर परदेशात उल्लेखनीय यश मिळवले आहे. यात सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला आहे विराट कोहली. २०१५ पासून भारतीय संघाने ६४ कसोटी सामने खेळले असून यातील ४० सामन्यात विजय मिळवला आहे. भारताला केवळ १३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर ११ कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत. विराट कोहली भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार देखील आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ६० कसोटी सामने खेळतांना ३६ सामन्यात विजय मिळवला आहे. तर केवळ १४ सामने गमावले आहेत.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि कोहलीने प्रत्येकी ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला २७ कसोटी सामन्यात विजय मिळाला आहे. तर माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताला ४९ कसोटी सामन्यात २१ विजय मिळाले आहेत. त्यामुळे कोहली याबाबतीत धोनी आणि गांगुली यांच्याही पुढे आहे. कोहली हाच सिलसिला जारी ठेवत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील विजय मिळवेल, अशी भारतीय क्रिकेट रसिकांना आशा असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
आयसीसीकडून विनू मंकड यांना मोठा सन्मान; ५ युगांतील १० दिग्गजांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोहली निभावणार कामचलाऊ गोलंदाजाची भूमिका? ‘या’ व्हिडिओतून मिळाले संकेत
मायदेशात इंग्लंडवर पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडने ८ विकेट्सने दुसरी कसोटी जिंकत मिळवला मालिका विजय