भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा खेळाडू विराट कोहली गेल्या काही दिवसात संघर्ष करताना दिसत आहे. त्याला इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात केवळ दोनच अर्धशतके आत्तापर्यंत करता आली आहेत. त्यामुळे त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. पण, त्याने गुरूवारी (१९ मे) गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल २०२२ च्या ६७ व्या सामन्यात ५४ चेंडूत ७३ धावांची खेळी करत, त्याचा दर्जा पूर्वीसारखाच असल्याचे सिद्ध केले. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. या सामन्यानंतर त्याने जोस बटलरबरोबर झालेल्या चर्चेचा खुलासा केला आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) खुलासा केला की, आयपीएल २०२२ स्पर्धेदरम्यानच (IPL 2022) त्याची राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरबरोबर (Jos Buttler) चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान, त्यांच्यात गमतीशीर संवादही झाला होता. याबद्दल स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये हरभजन सिंगबरोबर बोलताना त्याने सांगितले की, ‘जोस बटलर राजस्थान रॉयल्सच्या सामन्यानंतर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, मला तुला काही विचारायचे आहे. मी त्याला म्हटलो की, तू ऑरेंज कॅप घातली आहेस, मला काय विचारणार आहेस, मी धावा करू शकत नाहीये आणि आम्ही यावर खूप हसलो.’
सध्या जोस बटलर आयपीएल २०२२ हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १३ सामन्यांत ५२.२५ च्या सरासरीने ६२७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३ शतकांचा आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने १४ सामन्यांत २३.७७ च्या सरासरीने ३०९ धावा केल्या आहेत. पण, तो आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सध्या पहिल्या २० जणांमध्ये अद्याप जागा मिळवू शकलेला नाही.
विराटला दीड वर्षांनी सामनावीर पुरस्कार
विराटने गुजरात टायन्सविरुद्ध ७३ धावा केल्याने त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. हा त्याला आयपीएल २०२० नंतरचा पहिलाच आयपीएलमधील सामनावीर पुरस्कार आहे. या सामन्यात गुजरातने २० षटकात ५ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर बेंगलोरने १६९ धावांचे आव्हान १८.४ षटकात २ विकेट्स गमावत पूर्ण केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये केली तोडफोड, तर बीसीसीआयचा चढला पारा; लगावली फटकार
मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी धावला विराट कोहली, स्टेडिअममध्ये बसून विजयासाठी करणार प्रार्थना?
रिंकू सिंगच्या वडीलांनी का सोडले होते २-३ दिवस जेवण, स्वत: क्रिकेटरने केलाय खुलासा