भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 मध्ये शानदार कामगिरी करत आहे. भारताने पहिले दोनही सामने जिंकत विश्वचषकात विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला 4 विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्स संघाला 56 धावांनी पराभवाची चव चाखवली. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या दोन्ही सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे विराट सातत्याने ऑस्ट्रेलियात कशाप्रकारे यशस्वी होतो हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता स्वतः विराटने या प्रश्नाचे उत्तर दिलेय.
विराटने नुकतीच विश्वचषकाचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीला मुलाखत दिली. त्याने या मुलाखतीत आपल्या ऑस्ट्रेलियातील यशाचे रहस्य काय आहे हे सांगितले. तो म्हणाला,
“मी कोणतेही व्हिडिओ पाहत नाही. मी थेट बॅट घेतो आणि नेट्समध्ये जातो. तिथे जाऊन शिकण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे. सुरुवातीला आपण गोंधळून जाऊ शकतो मात्र हळूहळू गोष्टी योग्यरीत्या घडतात. एखादा चेंडू जास्त उसळला तर त्यावर कशाप्रकारे प्रतिक्रिया द्यायची हे समजून जाते.”
तो पुढे म्हणाला,
“ऑस्ट्रेलियात कसे खेळायचे याची तयारी तुम्ही भारतात राहून करू शकत नाही. तेथील परिस्थिती आणि मैदानानुसार आपल्याला आपल्यात बदल करावे लागतात. तुम्ही येथे वेगाचा यशस्वीपणे सामना केल्यास एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून यशस्वी होऊ शकता. आपल्या मूळ खेळाशी काहीही तडजोड करण्याची येथे गरज नसते. केवळ मानसिकरीत्या खंबीर राहायला हवे.”
विराटने ऑस्ट्रेलियात 55 सामन्यात 3274 धावा केल्या असून, त्याची सरासरी 56.44 आहे. ऑस्ट्रेलियात त्याच्या बॅटमधून 11 शतके आणि 17 अर्धशतके आली आहेत. तो या देशात भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. केवळ सचिन तेंडुलकरने (3300) त्याच्या पेक्षा जास्त धावा ऑस्ट्रेलियात बनवलेल्या आहेत.
विराटने ऑस्ट्रेलियात आल्यापासून जबरदस्त खेळ दाखवला आहे. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ अडचणीत असताना त्याने भारताला सामना जिंकून देणारी 82 धावांची नाबाद खेळी केली होती. तर नेदरलँड्सविरूद्धही त्याच्या बॅटमधून नाबाद 62 धावा आल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता पाकिस्तानी चाहतेच उडवू लागले आपल्या संघाची खिल्ली; म्हणाले…
शतक एक विक्रम अनेक! फिलिप्सच्या सेंच्युरीने रचले दोन रेकॉर्ड, एकात बनलाय जगातील पहिला फलंदाज