भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपले कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर कोहलीने तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपला निर्णय जाहीर केला. (Virat Kohli Resign As Test Captain) या पोस्टमध्ये त्याने आपल्याला साथ देणार्या दोन व्यक्तींचे मुख्यत्वे आभार मानले.
त्या दोन व्यक्तींचे मानले आभार
विराट कोहलीने राजीनामा देताना जे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे, त्यात त्याने बीसीसीआय, संघ सहकारी आणि रवी शास्त्री व महेंद्रसिंग धोनी यांचे आभार मानले आहेत. “कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तसेच भारतीय क्रिकेटला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची क्षमता धोनीला माझ्यामध्ये दिसली, त्याबद्दल एमएस धोनीचे मनापासून आभार” असे विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
तसेच भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबतीत त्याने लिहिले
‘रवी भाई (रवी शास्त्री) आणि सपोर्ट स्टाफ यांचेही आभार, ते कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने प्रगती करणाऱ्या या गाडीचे इंजिन होते. तुम्ही सर्वांनी ध्येय प्रत्यक्षात गाठण्यासाठी सर्वात मोठा वाटा उचलला.’ यासह आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे देखील त्याने ऋण व्यक्त केले.
विराटचा तडकाफडकी राजीनामा
विराट कोहली याने कसोटी मालिका गमावल्यानंतर २४ तासाच्या आत आपला राजीनामा दिला. त्याने आपल्याला देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे धन्यवाद मानले. विराटने टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडलेले. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेआधी त्याला कर्णधारपदावरून हटविले होते. त्यानंतर आता विराट स्वतः कसोटी कर्णधार पदावरून पायउतार झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आदर्शवत’ अशीच राहिली विराटची नेतृत्व कारकीर्द; कोणालाही न जमलेले केलेत अनेक पराक्रम (mahasports.in)