भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी आगामी टी२० विश्वचषकानंतर भारतीय टी२० संघाच्या आणि आयपीएल २०२१ च्या हंगाम संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या या निर्णयानंतर अनेक विषयांवर चर्चा होत आहेत. यामध्ये २०२३ च्या विश्वचषकापूर्वी विराटला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही हटवले जाऊ शकते अशाही चर्चा आहेत. याबाबत आता नवे वृत्तही पुढे येत आहे, ज्यामध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटला ६ महिन्यापूर्वीच एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे.
‘इंडिया अहेड’च्या एका वत्तानुसार प्रशिक्षक रवी शास्त्रींनी विराटला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकदिवसीय आणि टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विराटने त्यावेळी शास्त्रींचा सल्ला ऐकला नाही आणि आता टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराटने त्याच्या निर्णयाची घोषणा करणाऱ्या पत्रात लिहिले होते की, तो एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहे.
बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले आहे की, “विराट कोहलीच्या कर्णधारपदावर चर्चा त्यावेळी सुरू झाली; जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला त्याच्या अनुपस्थितिमध्ये हरवले होते. त्याच्या मते जर सर्वकाही ठीक राहिले नाही, तर कोहलीने २०२३ एकदिवसीय विश्वचषकापूर्वी कर्णधारपद सोडले पाहिजे.”
सूत्राने पुढे सांगितले की, “प्रशिक्षक रवी शास्त्रींनी साधारण सहा महिन्यांपूर्वी विराट कोहलीला एकदिवसीय आणि टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला होता. पण विराटने त्यांच्या सल्ल्याला न ऐकल्यासारखे केले आणि नंतर स्वत:हून टी२० चे कर्णधारपद सोडले. एकदिवसीयमध्ये तो आताही कर्णधारपदासाठी तयार आहे. तसेच बोर्डही विराटला एका खेळाडूच्या रूपात उपयोग करण्यासाठी योजना बनवत आहे. कारण आजही तो सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे.”
संघात विराटच्या नेतृत्वाविषयी कोणाचीच तक्रार नाही
संघात कोहलीच्या नेतृत्वाविषयी कसलाच विवाद नसल्याचे सुत्राने सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, “संघात विराटच्या कर्णधारपदाविषयी कसलीच दुहेरी मते नाहीत. संघात सर्वकाही ठीक आहे. कोणालाच त्याच्या नेतृत्वाविषयी आपत्ती नाही. तसेच आपल्याला फक्त एका चांगल्या नेतृत्वाचीच नाही, तर अशा नेतृत्वाची गरज आहे जो संघाला पुढे घेऊन जाईल.”
यापूर्वी २००५ मध्ये त्यावेळचे भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी फलंदाजीकडे लक्ष देण्यासाठी संघाचे नेतृत्व सोडण्याचा सल्ला दिला होता. यानंतर हा मुद्दा क्रिकेटविश्वातील त्यावेळचा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता. याला गांगुली-चॅपल विवाद असे म्हटले जाते. मात्र, रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यात अशाप्रकारचा कसलाही वाद नाही.
विराटच्या कारकिर्दीविषयी विचार केला तर, त्याने आतापर्यंत ४५ टी२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी २९ सामने जिंकले आहेत. तसेच ९५ एकदिवसीय सामन्यांपैकी ६५ सामन्यांमध्ये विराटने संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६५ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले असून यापैकी ३८ सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“आयपीएल २०२१ नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडतो म्हणणाऱ्या विराटची अर्ध्यातच होईल हाकालपट्टी”
फलंदाजीत फ्लॉप, त्यात विनाकामी रिव्ह्यूही घालवला वाया; नेटकऱ्यांनी केदारची उडवली खिल्ली