पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारतीय संघाच्या प्रयत्नांना बांग्लादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा कसोटी हंगाम बांग्लादेश मालिकेपासून सुरू होणार असून पुढील काही महिन्यांत संघाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. या दरम्यान भारतीय संघाला बांग्लादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला की, आगमी कसोटी हंगामात भारतासाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या बॅटमधून होतील. कारण त्याला कसोटी क्रिकेट खूप आवडते.
विराट कोहली बराच काळ कसोटी फॉरमॅट खेळलेला नाही. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केपटाऊनमध्ये शेवटची कसोटी खेळली होती. यानंतर त्याने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकही सामना खेळला नाही. याच कारणामुळे कोहलीला लाल चेंडूने खेळताना पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असून आगामी कसोटी मोसमात त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
पुढे बोलताना रैना म्हणाला “रोहित हा हुशार कर्णधार आहे. त्याने टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून हे सिद्ध केले आहे. पण विराट कोहलीच्या लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. त्याला कसोटीचे स्वरूप आवडते. त्याचा तो आदर देखील करतो. डब्ल्यूटीसीच्या दृष्टीने भारत 10 सामने खेळणार आहे. मला विश्वास आहे की विराट या कसोटी चक्रात खूप धावा करेल.
“विराट दबावाखाली चांगली कामगिरी करतो आणि या कसोटी मोसमात तो त्याच्या खेळाच्या केंद्रस्थानी असेल. बांग्लादेशकडे मजबूत वेगवान गोलंदाज आहेत, पण कोहलीने हरिस रौफसारख्या गोलंदाजांविरुद्ध आपले कौशल्य दाखवले आहे. तसेच आव्हानांमुळे तो चांगली कामगिरी करेल. आणि मला आशा आहे की यावेळी देखील असेच घडेल”.
हेही वाचा-
“हिंदूंवर अत्याचार होत असताना परवानगी कशी?” भारत-बांगलादेश मालिकेवर आदित्य ठाकरेंचा सवाल
“5-0 ने बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकू…” ऑस्ट्रेलियन दिग्गजाने टीम इंडियाला डिवचलं
IND VS BAN: पावसामुळे सामन्यात येणार बाधा! हवामान अंदाजाने चाहत्यांची चिंता वाढली