आयपीएल 2023चा 43 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला गेला होता. या सामन्यात मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळालेला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक व लखनऊ चा मेंटर गौतम गंभीर हे या वादाच्या केंद्रस्थानी होते. या वादानंतर मॅच रेफ्रींनी तिघांवर दंडात्मक कारवाई केलेली. मात्र, आता विराट कोहलीने थेट भारतीय क्रिकेट नियमक मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहून याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने छोट्या धावसंख्येचा बचाव करत शानदार विजय मिळवला. मात्र सामन्या दरम्यान विराट कोहली व नवीन उल हक यांच्या दरम्यान बाचाबाची झाली होती. सामना संपल्यानंतर हात मिळवणी करताना देखील या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीर याने देखील या वादात उडी घेत विराटला काही शाब्दिक वार केले. हे प्रकरण चिघळल्याने दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले. या संपूर्ण प्रकरणामुळे आयपीएल व सर्व खेळाडूंची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली. मॅच रेफ्रींंनी गंभीर व विराट यांच्यावर शंभर टक्के मॅच फी कपातीची कारवाई केली. तर, नवीनला 50 टक्के मॅच फी इतका दंड आकारला गेलेला.
विराटने याबाबत पत्र लिहिताना म्हटले,
“मी निर्दोष आहे. त्या प्रकरणात मी विरोधी लोकांना असे काहीही बोललो नव्हतो, ज्यामुळे मोठी कारवाई अयोग्य आहे.”
विराटने त्याच्यावर झालेल्या कारवाईनंतर काही बीसीसीआय अधिकाऱ्यांकडे खाजगीत याप्रकरणी निराशा व्यक्त केलेली. विराटला हा दंड म्हणून तब्बल 1 कोटी 25 लाख अशी मोठी रक्कम भरावी लागणार होती. मात्र, आरसीबीने त्याची ही रक्कम भरली होती.
(Virat Kohli Wrote Letter To BCCI After Gautam Gambhir And His Fight)