भारतीय पुरूष संघाने २०२४मध्ये टी२० विश्वचषक जिंकला. भारताची ही स्पर्धा जिंकण्याची दुसरीच वेळ होती. २००७ला टी२० चॅम्पियन बनलेल्या भारताला पुन्हा एकदा विजेता बनण्यासाठी नंतर खूप वाट पाहावी लागली. त्यामुळे २०२४च्या विश्वचषकाचे महत्वही तेवढेच अधिक. हा विश्वचषक भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकला होता. सध्या दोघेही त्यांच्या पदावरून निवृत्त झाले आहेत. नुकतेच द्रविडने भारताच्या या विजयामागचे गुपित सांगितले आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघाद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात द्रविड बोलत होतो. रोहित त्याच्या स्वभावामुळे संघसहकाऱ्यामध्ये लोकप्रिय होता. ज्यामुळे सर्वामध्ये एक प्रकारचा बॅलन्स आला होता आणि संघामध्ये बदल करायला सोपे जात होते, असे मत द्रविडने मांडले.
“जेव्हा कर्णधार उभा राहतो आणि म्हणतो ‘मी जबाबदारी घेतो भलेही त्याचा परिणाम माझ्या विक्रमांवर किंवा धावा करण्यावर होईल’ तेव्हा संघाला हा संदेश देणे सोपे होते. त्याने सर्व जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या. यामुळे एक प्रशिक्षक म्हणून माझे काम सोपे होते”, असे द्रविड म्हणाला.
भारताला २०२२च्या टी२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर खेल बदलण्याची गरज आहे, हे रोहितने ओळखले. मर्यादित षटकातील खेळ बदलत आहे हे त्यालाही माहित होते. मागील १० वर्षापासून क्रिकेटमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले, तेव्हा आपण काहीसे मागे असल्यासारखे वाटले. त्यामुळे थोडा विचार करत काही बदल केले, याबाबत द्रविड बोलत होते.
“काही वेळेला आम्ही थोडी जोखीम घेतली. तेव्हा त्याच्याशी संवाद साधण्यात काही अडचण आली नाही. तो सगळ्या गोष्टीवर विचार करून त्या मान्य करत असे. तो एक असा व्यक्ती आहे ज्याने खेळाला पुढे नेण्याची जबाबदारी उत्तम पार पाडली,” असेही द्रविड पुढे म्हणाला.
रोहितच्या फलंदाजीबाबतही द्रविडने सांगितले, “तो एक चांगला फलंदाज आहे यात काही शंकाच नाही. त्याची कामगिरी आधीपासूनच चांगली राहिली आहे. त्याच्या विक्रमाबाबत बोललो तर तेही उत्तम आहे. त्याने २०१९च्या विश्वचषकात ५ शतकी खेळी केल्या होत्या. आता लय बदलण्याची गरज होती.”
द्रविडच्या मते प्रशिक्षण नेहमी बदलत राहते. तो म्हणाला, “एक प्रशिक्षक म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या प्रकारचे प्रशिक्षण मिळाले तसे न देता त्यात बदल करावा. तुम्हाला माहित आहे केकी हे एक चांगले प्रशिक्षक होते. मी चेंडू हवेत मारला तर ते मला मैदानावर पळवत. त्यांचे म्हणणे असे होते की मी चेंडू जमिनीवरच खेळवावा.”
द्रविडच्या या मतांवरून त्याच्यात आणि रोहितमध्ये असलेल्या प्रशिक्षक-कर्णधार भुमिकेबाबत भारताचा खेळ कसा बदलला आणि विश्वचषकात संघाचा विजय सोपा झाला हे दिसून येते. सध्या भारताचे मुख्य प्रशिक्षकपद गौतम गंभीर सांभाळत आहे.






