भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेटने पराभव केला आहे. भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात उतरताना नियमित कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल.
विराट पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे , तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाल्याने तो उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला उर्वरित सर्व सामन्यांसाठी भारताचा कर्णधार घोषित करण्यात आले आहे. अजिंक्यबद्दल बोलताना भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर म्हणाला की विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यकडे उत्तम कामगिरी करण्याची मोठी संधी आहे.
एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला, ‘भारतीय संघाने हे लक्षात ठेवावे की सामन्यातील पहिले दोन दिवस भारताचा दबदबा होता. सुरुवातीचे दोन दिवस सामना भारताच्या बाजूने झुकलेला होता. एका खराब सत्राबद्दल संघ निश्चितच दुखी असेल, पण त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की मालिकेत अजून तीन सामने बाकी असून ,बरेच क्रिकेट खेळायचे बाकी आहे. तसेच संघाकडे त्यांचा नियमित कर्णधार व सर्वोत्तम खेळाडू विराट कोहली नाही ‘.
अजिंक्यबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, ‘अजिंक्य रहाणेवर बरेच काही अवलंबून राहणार आहे. मोहम्मद शमी देखील भारतीय संघात नाही, त्यामुळे हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की भारतीय संघ कशाप्रकारे मैदानात उतरतो.’ यापूर्वी गंभीरने प्रतिक्रिया दिली होती की भारतीय संघाने शुभमन गिल, के एल राहुल व रिषभ पंत यांना संधी द्यावी.
दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाकडून सर्वांनाच उत्तम पुनरागमनाची अपेक्षा असणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की नियमित कर्णधार विराट कोहली व अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ मैदानात कशाप्रकारे कामगिरी करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादमधून होणार बाहेर? वॉर्नरने दिले ‘हे’ उत्तर
बाबारे, ही कसली भानगड..! भारत सरकारमुळे बीसीसीआयला होऊ शकते तब्बल ९०५ कोटींचे नुकसान
मी नाही, माझं कामच बोलेल…! निवड समीतीचे प्रमुख चेतन शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया






