जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराट कोहलीची गणना केली जाते. भारतीय संघाचा कर्णधार असताना देखील त्याने अनेक अप्रतिम खेळी खेळल्या आहेत. विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. पण गेल्यावर्षी त्याने टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजिनामा दिल्यानंतर काहीच दिवसांत एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन त्याला हटवण्यात आले. त्यानंतर शनिवारी (१५ जानेवारी) विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे आता विराट सगळ्याच क्रिकेट स्वरुपाच्या संघांच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. कर्णधार म्हणुन त्याने कसोटीत अनेक सर्वोत्कृष्ट डाव खेळले आहेत. त्यापैकी ५ सर्वात संस्मरणीय डावांबद्दल या लेखामधून जाणून घेऊ.
ऍडलेड २०१४ कसोटी
विराटने डिसेंबर २०१४ मध्ये ऍडलेडमध्ये पहिल्यांदा कसोटी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिला सामना खेळला होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावात शतके लगावली. त्याने पहिल्या डावात ११५ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात १४१ धावांची शानदार खेळी केली होती. या सामन्यात भारतासमोर ३६४ धावांचे आव्हान होते. विराटशिवाय मुरली विजयने ९९ धावा केल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाने ४८ धावांनी हे सामना जिंकला. विराटची ही खेळी कायम लक्षात राहिली असुन त्याने कर्णधापदाची जबाबदारी चोख बजावली.
पुणे २०१९ कसोटी
विराटने कर्णधार म्हणून २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यात २५४ धावांची शानदार खेळी खेळली होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात ३३६ चेंडूंचा सामना खेळत ३३ चौकार आणि २ षटकार मारले होते. भारताने हा सामना एक डाव आणि १३७ धावांनी जिंकला होता.
दिल्ली २०१७ कसोटी
विराटने २ डिसेंबर २०१७ रोजी दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध आणखी एक शानदार खेळी खेळली होती. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात २४३ धावा केल्या. मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने २८७ चेंडूत २५ चौकार मारत २४३ धावा केल्या होत्या. भारताने ७ बाद ५३६ धावा करुन हा डाव घोषित केला, पण पाचव्या दिवशी हा सामना अनिर्णित राहिला.
अधिक वाचा – विराटने केव्हा घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय? बुमराहने सांगितली ‘राज की बात’
नॉर्थ साऊंड २०१७ कसोटी
कर्णधार म्हणून विराटने २०१७ मध्ये नॉर्थ साउंड येथे वेस्ट इंडीजविरुद्ध २८३ चेंडूत २०० धावांची संस्मरणीय खेळी खेळली. यात त्याने २४ चौकार मारले. प्रथम फलंदाजी करत भारताने ८ बाद ५६६ धावा केल्या आणि डाव घोषित केला. यानंतर इंडिजचा संघ २४३ आणि २३१ धावा करु शकला. त्यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि ९२ धावांनी जिंकला.
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?
मुंबई २०१६ कसोटी
साल २०१६ मध्ये मुंबई येथे विराटने इंग्लंडविरुद्ध शानदार डाव खेळत २३५ धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिल्या डावात ४०० धावा केल्यानंतर भारताने ६३१ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत विराटने ३४० चेंडूंचा सामना करत २५ चौकार आणि एक षटकार लगावला होता. मुरली विजयने सुद्धा १३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांत आटोपून सामना एक डाव आणि ३६ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितनंतर खुद्द सिनियर शर्माजींची मैदानावर जोरदार फटकेबाजी, वडिलांच्या फलंदाजीवर ‘हिटमॅन’ही फिदा
“विराट आणि शास्त्री यांनी धोनीला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडले”
आयपीएल न खेळता ‘हे’ ३ क्रिकेटपटू करू शकतात भारतीय संघात पदार्पण