इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. जेव्हा स्टार फलंदाज विराट कोहलीने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कोहलीच्या निर्णयाने चाहते आणि माजी क्रिकेटपटूंना धक्का बसला. आता इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला चाैथ्या क्रमांकावर किंग कोहलीची उणीव भासू शकते. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर, कोहलीला कसोटीत क्रमांक-4चे स्थान मिळाले. ज्यात त्याने भरपूर धावा करून मास्टर ब्लास्टरची अनुपस्थिती जाणवू दिली नाही.
आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने विराट कोहलीबद्दल मोठा दावा केला आहे. क्लार्क म्हणाला की जर भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर दारुण पराभव मिळाला तर विराट कोहली निवृत्तीतून परतू शकतो. क्लार्कचा असा विश्वास आहे की कोहलीला कसोटी क्रिकेट खूप आवडते, जे त्याच्या शब्दांतून दिसून येते.
मायकेल क्लार्कने Beyond23 पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, ‘मला खरोखरच यावर विश्वास आहे, जर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये दारुण पराभव मिळाला. समजा ते 0-5 ने मालिका गमावतात, तर मला वाटते की चाहते विराट कोहलीला पुन्हा कसोटी क्रिकेट खेळताना पाहतील. जर कर्णधार, निवड समिती आणि चाहते पाठिंबा देत असतील तर मला वाटते की तो परत येईल. त्याला अजूनही कसोटी क्रिकेट खूप आवडते. त्याच्या शब्दांतून तुम्हाला कसोटी क्रिकेटवरील त्याचे प्रेम स्पष्टपणे जाणवते.’
मायकेल क्लार्क म्हणला, ‘त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामागे काहीतरी कारण असेल, पण ही वेळ प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत येते. जर तसे असेल तर ते ठीक आहे. पण जर संघाने चांगली कामगिरी केली नाही आणि इंग्लंडमध्ये 0-5 असा पराभव पत्करला, जे मला वाटत नाही की होईल. पण जर तसे झाले तर प्रश्न नक्कीच निर्माण होतील. मला विश्वास आहे की हा भारतीय संघ इतका मजबूत आहे की तो विराट कोहली आणि रोहित शर्माशिवायही इंग्लंडमध्ये जिंकू शकतो.’
मायकेल क्लार्कने असेही सूचित केले की विराट कोहलीचे इंग्लंडविरुद्ध अजूनही एक अपूर्ण काम आहे. 2014च्या दौऱ्यातील कोहलीची कामगिरी खूप निराशाजनक होती. तो पाच कसोटी सामन्यांमध्ये फक्त 134 धावा करू शकला. तथापि, चार वर्षांनंतर 2018 मध्ये चित्र बदललेले दिसत होते. त्यानंतर विराट कोहलीने 59.30 च्या सरासरीने 593 धावा केल्या. तथापि, भारताने ती मालिकाही 1-4 ने गमावली.
मायकेल क्लार्क पुढे म्हणाला, ‘भारतात क्रिकेटबद्दल खूप उत्साह आहे. भारतीय चाहते त्यांच्या संघाला जिंकताना पाहू इच्छितात. मला वाटते की भारतीय संघ अजूनही इंग्लंडला हरवू शकतो. मला वाटते भारताचा संघ चांगला आहे. पण जर ते इंग्लंडला हरवू शकले नाहीत, तर मला वाटते की विराट कोहलीला निवृत्तीतून बाहेर पडावे लागेल.’