---Advertisement---

चेन्नई कसोटीसाठी दिग्गजाने निवडली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, ‘या’ अष्टपैलूला दिली संधी

On: सोमवार, फेब्रुवारी 1, 2021 1:33 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने या बहुप्रतिक्षित मालिकेची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तत्पुर्वी बीसीसीआयने पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. तरीही पहिल्या कसोटी सामन्यातील अंतिम ११ जणांचा पथक जाहीर होण्यास वेळ आहे. त्यामुळे आतापासून क्रिकेट तज्ञांनी भारताच्या प्लेइंग इलेव्हनची चर्चा सुरू केली आहे.

अशात रविवारी (३१ जानेवारी) भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफर यांनी पहिल्या कसोटी सामन्यासाठीचा भारतीय संघ निवडला आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांनी आपल्या संघात अक्षर पटेल याला संधी दिली आहे. सोबतच त्याची निवड करण्यामागील कारणही त्यांनी सांगितले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.

वसीम जाफर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना सलामीला फलंदाजीसाठी निवडले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याला संधी दिली आहे. चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेची निवड केली आहे. तसेच आघाडीचे पाचही फलंदाज बाद झाल्यानंतर रिषभ पंत दमदार कामगिरी करत संघाला चांगला शेवट करून देण्याची क्षमता राखतो. त्या अनुशंगाने जाफर यांनी पंतला सहाव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जागा दिली आहे.

जाफर यांनी अष्टपैलू खेळाडूंच्या रुपात अक्षर पटेल आणि आर अश्विन यांची निवड केली आहे. अक्षरच्या नावापुढे स्टार करत त्यांनी लिहिले आहे की, इंग्लंडच्या फलंदाजांची सर्वात मोठी कमजोरी डावखुरे फिरकीपटू आहेत. अर्थात त्यांना सांगायचे आहे की, इंग्लंडच्या फलंदाजांविरुद्ध डावखुरा फिरकीपटू अक्षर उत्कृष्ट गोलंदाज ठरेल. त्यामुळे त्याला संधी देणे गरजेचे आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही स्थान दिले आहे.

परंतु संघातील इतर गोलंदाजांमध्ये जाफर यांना योग्य निर्णय घेतला आला नाही. त्यामुळे त्यांनी शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या चौघांचीही निवड केली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी वसीम जाफर यांची प्लेइंग इलेव्हन 

वरची फळी- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा

मधली फळी- विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत

अष्टपैलू- अक्षर पटेल, आर अश्विन

गोलंदाज- कुलदीप यादव/शार्दुल ठाकूर, इशांत शर्मा/मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह

लवकरच भिडणार भारत आणि इंग्लंड संघ 

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---