मुंबई । साऊथम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह वेस्ट इंडीजने अनेक विक्रम स्वतःच्या नावे केली आहे. तब्बल दोन दशकांनंतर वेस्ट इंडिजच्या संघाने इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच देशात कसोटी मालिकेतला पहिला सामना जिंकला आहे.
वेस्ट इंडीजच्या संघाने तब्बल 13 वर्षांनंतर विदेशात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. वेस्ट इंडीजने 2000 साली इंग्लंडविरुद्धच एजबस्टन स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. तसेच 2007-08 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटी मालिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे झालेला पहिला कसोटी सामना जिंकला होता. या दोन्ही मालिकेत वेस्ट इंडिजने विजयी आघाडी घेतली असतानाही त्यांना मालिकेत पराभव स्वीकारावा लागला.
वेस्ट इंडीज संघाने चौथ्या डावात दोनशे किंवा त्यापेक्षा कमी धावांचा पाठलाग करताना विजय मिळवण्याचा विक्रमही स्वतःच्या नावावर केला आहे. आतापर्यंत वेस्ट इंडीज संघाने 200 किंवा त्यापेक्षा कमी धावांचा पाठलाग करताना 55 वेळा विजयी झाला आहे. तर 6 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने दमदार खेळ करत सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिला. या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने सामन्यात 7 तर दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या शेनन गॅब्रियल याने 9 गडी बाद केले. तर फलंदाजीत रोस्टन चेस, जार्मेन ब्लॅकवूड यांनी धमाकेदार खेळी करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
वेस्ट इंडिजने इंग्लंडला पहिल्या सामन्यात चार गडी राखून पराभव करत इतिहास घडवला. कोरोना व्हायरसच्या नंतर कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवणारा वेस्ट इंडिज हा पहिला संघ बनला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांनी पहिल्या डावात 204 धावा तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने 318 धावा करत इंग्लंडवर 114 धावांची आघाडी मिळवली होती. इंग्लंडने दुसऱ्या डावात 313 धावा करत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य दिले. वेस्ट इंडीजने हे आव्हान सहा गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. या विजयासह वेस्ट इंडिजने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे.