क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धा मानाची मानली जात असल्याने विश्वचषक विजेत्या संघांचे नाव पुढे कित्येक वर्षे सन्मानाने घेतले जाते. वरिष्ठ भारतीय पुरुष संघाने आत्तापर्यंत वनडेतील २ विश्वचषक जिंकले आहेत. पहिल्यांदा भारताने १९८३ ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक जिंकला तर दुसरा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला २८ वर्षांची वाट पहावी लागली. भारताने २०११ ला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला.
भारताने जिंकलेल्या या दोन्ही विश्वचषकाच्या ट्रॉफीच्या प्रतिकृती सध्या मुंबईतील एमसीए क्रिकेट सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.
साल १९८३ ला भारताने वेस्ट इंडिजला हरवून विश्वचषक जिंकल्यानंतर जो प्रुडेन्शिअल चषक उंचावला होता. तो खरा प्रुडेन्शिअल चषक लंडनला लॉर्ड्स संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. हा खरा चषक १९८३ ला विश्वविजेत्या भारतीय संघाकडे काही दिवस होता. भारतात संघाचे स्वागत व मिरवणुक झाल्यानंतर काही दिवसांनी हा खरा चषक लंडनला परत पाठविण्यात आला.
पुणेस्थित छायाचित्रकार संजय झिंजाड जेव्हा लाॅर्ड्स मैदानावर गेले होते तेव्हा १९८३च्या भारताच्या विश्वविजयाची ट्राॅफी पाहताना त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ते म्हणातात, “मी जेव्हा २०१५साली लाॅर्ड्सवर गेलो होतो, तेव्हा मी संग्रहालय पहायला आवर्जुन गेलो होतो. आमचा अंदाजे २०-२२ लोकांचा ग्रुप होता व गाईडने जेव्हा आम्हाला म्हटले की ‘जे- जे भारतीय आहेत ते पुढे या, ही ट्राॅफी कपिलने १९८३ला विश्वचषक जिंकल्यावर हातात घेतलेली खरीखुरी ट्राॅफी आहे. तेव्हा गहिवरुन आलं होतं. भारतीय संघाने १९८३साली केलेली कमाल त्या ट्राॅफीच्या रुपात ३०-३२ वर्षांनी पाहतानाच्या भावना काही वेगळ्याच होत्या.’
साल २०११ च्या विश्वचषकावेळी तर भारतीय संघाला दिलेला विश्वचषक खरा होता की खोटा यावर बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी अनेक प्रमोशनल इव्हेंट्स आणि ट्रॉफी टूर दरम्यान दाखवण्यात आलेली ट्रॉफी कर न भरल्याच्या कारणामुळे मुंबई विमानतळाच्या कस्टम विभागाच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला होता.
https://twitter.com/BCCI/status/946647606301564928
याला आयसीसीने पुढे पृष्टी देताना म्हटले होते की मुंबईला विजेत्या भारताला दिलेली ट्राॅफी ही प्रतिकृती आहेत तर कस्टमने पकडलेली ट्राॅफी ही प्रोमोशनल इव्हेंटासाठी तयार करण्यात आलेली ट्राॅफी होती.
परंतु तेव्हा माध्यमांमधील आलेल्या अनेक वृत्तांनुसार खरी ट्राॅफी हीच कस्टम विभागाने पकडली होती व इंपोर्ट ड्युटीमधून या ट्राॅफीला सुट देण्यात येणार नव्हती.
आयसीसी विश्वचषकाची ही खरी ट्रॉफी संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या आयसीसीच्या मुख्यालयात ठेवलेली आहे. विश्वचषक विजेते संघ विश्वचषक स्पर्धा संपल्यावर मायदेशी परत जाताना या ट्रॉफीची प्रतिकृती घेऊन जातात आणि खरी ट्रॉफी पुन्हा आयसीसीच्या मुख्यालयात स्पर्धा संपल्यावर ठेवून दिली जाते. परंतू अनेकदा या पद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहे.
खऱ्या आयसीसी विश्वचषक ट्रॉफीवरील स्तंभांच्या आतील बाजूस आयसीसीचा लोगो कोरलेला आहे आणि प्रतिकृतींमध्ये त्या त्या विश्वचषक स्पर्धेचा लोगो स्तंभांच्या आतील बाजूस आहेत. तसेच खऱ्या ट्राॅफीवर आजपर्यंतच्या विजेत्या संघाची नावे आहे. तर प्रतिकृतीवर जो संघ जिंकेल त्यावर्षी फक्त त्याचं नावं असतं. याव्यतिरिक्त मोठा फरक खऱ्या ट्रॉफी आणि प्रतीकृतीमध्ये नाही.
ट्रेंडिंग घडामोडी –
क्रिकेटची पंढरी वानखेडे स्टेडियमचा हा इतिहास आपणास नक्कीच जाणुन घ्यायला आवडेल!
असा आहे विश्वचषकात विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या ट्राॅफीचा इतिहास