आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीचा टप्पा अंतिम चरणात पोहोचला आहे. गट १ मधील संघांचे सर्व सामने पार पडले असून त्यांचे उपांत्य फेरी सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून इतर ४ संघांचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. परंतु अजून गट २ मधील उपांत्य फेरीचे प्रतिस्पर्धी मिळणे बाकी आहे. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यापासून आपली विजयी मोहिम सुरू ठेवणारा पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र गट २ मधून उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ अजून ठरलेला नाही.
या स्थानासाठी न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तान, हे ३ संघ शर्यतीत आहेत. त्यातही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडचा सामना रविवारी (०७ नोव्हेंबर) गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकावरील अफगाणिस्तान संघाशी होणार आहे. या सामन्यावरुन उपांत्य फेरीचा दुसरा दावेदार ठरणार असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्यावर लागून आहेत.
अशी आहेत समीकरणे:
न्यूझीलंड विजयी झाल्यास-
४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी नामिबियाविरुद्धचा सामना मोठ्या अंतराने जिंकावा लागणार आहे. परंतु हे समीकरण तेव्हाच कामी येईल, जेव्हा अफगाणिस्तान रविवारच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करेल. परंतु न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीची गणिते अगदी सोपी होतील.
या सामना विजयासह न्यूझीलंडच्या खात्यात ८ गुणांची नोंद होईल आणि हा संघ सहज उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यासह अफगाणिस्तान आणि भारताचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. तसेच जर पाकिस्तानने रविवारी स्कॉटलँडविरुद्ध होणाऱ्या त्यांच्या अंतिम सामन्यात पराभवाची चव चाखल्यास नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानीही पोहोचू शकतो.
अफगाणिस्तान विजयी झाल्यास-
जर मोहम्मद नबीच्या नेतृत्त्वाखालील अफगाणिस्तान संघाने केन विलियम्सनच्या न्यूझीलंडला धोबीपछाड दिला तर त्यांच्याही खात्यात ६ गुण जमा होतील. यासह अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडच्या गुणांची बरोबरी होईल. त्यानंतर सोमवारी (०८ नोव्हेंबर) भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामन्यावरही उपांत्य फेरीतील दुसरा संघ कोण असेल, हे निर्भर करेल. कारण जर भारताने हा सामना जिंकला तर त्यांचे ६ गुण होतील. अशावेळी नेट रन रेटवर अंतिम संघ ठरेल.
परंतु जर नामिबियाने भारताला चितपट केले तर भारत टी२० विश्वचषकातून बाहेर होईल. मग न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांपैकी ज्या संघाचा नेट रन रेट जास्त असेल, तो संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.
न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामना टाय किंवा अनिर्णीत राहिल्यास-
तसे तर टी२० सामन्याचा निकाल न लागणे, अशी स्थिती फार कमी पाहायवास मिळते. कारण जरी सामन्यात बरोबरी झाली तरी सुपर ओव्हरवरुन त्याचा निकाल लावला जातो. परंतु जर कोणत्या कारणास्तव हा सामना बरोबरीत संपला किंवा अनिर्णीत राहिल्यास काय. तर अशावेळी उभय संघांना प्रत्येकी १ गुण विभागला जाईल. मग अफगाणिस्तानच्या खात्यात ५ गुण जमा होतील तर न्यूझीलंडचे ७ गुण होतील.
अशावेळी भारताने नामिबियावर मोठा विजय मिळवूनही तो निरुपयोगी ठरेल आणि न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
तीन संघांचे भविष्य एका सामन्यावर ठरणार; जाणून घ्या अफगानिस्तान वि. न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही
टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार भावूक; म्हणाला, ‘एका युगाचा अंत झाला’
VIDEO: ‘अंतिम सामन्या’त विकेट घेताच गेलला आनंदाने फुटले पंख, ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मारली मिठी