टी२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ च्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला १० विकेट्सने पराभूत केले. या पराभवाचे खापर काही चाहत्यांनी मोहम्मद शमी याच्यावर फोडले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीची गोलंदाजी महागडी ठरली होती. सामना संपल्यानंतर काही मिनिटांत सोशल मीडियावर त्याच्याबद्दल विनाकारण गोंधळ उडाला. त्यानंतर सर्व क्रिकेटपटू त्याच्या बचावात उतरले आहेत.
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानही शमीच्या बाजूने बोलला आहे. या संपूर्ण घटनेने त्याला चेतन शर्माची आठवण करून दिली आहे. योगायोगाने, यावेळी चेतन शर्मा भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता देखील आहेत. तेही सध्या दुबईत आहेत.
मोहम्मद रिझवानने सांगितले की, “चेतन शर्मा यांनाही ३५ वर्षांपूर्वी यापेक्षा जास्त नाराजीचा सामना करावा लागला होता. तेव्हा सोशल मीडियाचे युग नव्हते. पण परिस्थिती अधिक कठीण होती.”
सन १९८६ ची ही घटना आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना शारजाह येथे झाला होता. भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. पाकिस्तानच्या ९ विकेट पडल्या होत्या आणि त्यांना शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. पाकिस्तानचा फलंदाज जावेद मियांदादने चेतन शर्माच्या फुल टॉस बॉलवर षटकार ठोकून आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्या विजयानंतर भारतीय संघाला या धक्क्यातून बाहेर पडायला बरीच वर्षे लागली.
प्रत्येक क्रिकेटप्रेमीला तो षटकार आठवतो. त्याच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत. केवळ भारताने तो एक सामना गमावला म्हणून नाही तर त्या सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघावर दीर्घकाळ वर्चस्व गाजवले. चेतन शर्माच्या षटकातील तो शेवटचा चेंडू होता. पाकिस्तानला विजयासाठी ४ धावांची गरज होती आणि कपिल देवने चेतन शर्माला शेवटचे षटक दिले. शेवटच्या चेंडूआधी कपिल देव चेतन शर्माकडे गेले आणि एवढेच सांगितले की, चेतनने त्याला हवा तो चेंडू टाकावा पण ‘नो बॉल’ टाकू नकोस.
कपिल देव यांचा विचारही अगदी योग्य होता. पण नो बॉल न टाकण्याचा कर्णधाराचा आदेश इतका वरचढ ठरला की चेतन शर्माच्या हातातील चेंडू ‘फुल टॉस’ झाला आणि जावेद मियांदादने त्यावर षटकार ठोकला. त्या षटकारानंतर स्तब्ध झालेला भारतीय संघ आणि धावणारा जावेद मियांदादचे चित्र अनेक वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांना दुखावत राहिले. भारतीय संघ त्या सामन्यानंतर भारतात पोहोचला.
जेव्हा चेतन शर्माला दाढी काढावी लागली
भारतीय संघ परतला तेव्हा चेतन शर्माचे जवळचे मित्र त्याला विमानतळावर घेण्यासाठी आले होते. विमानतळावरून बाहेर पडताच भोजन करण्यासाठी ते एका रेस्टॉरंटमध्ये गेले. चेतन शर्मा रेस्टॉरंटमध्ये पोहोचले पण लोकांनी त्यांना घेरले. सर्वजण त्याच्यावर रागावले होते. परिस्थिती लक्षात येताच चेतनच्या मित्राने त्याला तेथून कसेतरी बाहेर काढले आणि थेट डिफेन्स कॉलनीत नेले. डिफेन्स कॉलनीतील एका न्हाव्याच्या दुकानात चेतन शर्माची दाढी काढण्यात आली. त्यानंतर त्याला रात्रीच चंदीगडला पाठवण्यात आले. चेतन शर्माचे वडीलही त्याच्यासोबत होते.
चेतनला आजही त्या बसचा सीट नंबरही आठवतो. ३-४ असे त्या सीटचे नंबर होते. वाटेत चेतन शर्माला कोणीही ओळखले नाही. चेतन शर्माला कोणी ओळखू नये, यासाठीच त्याला न्हाव्याकडे नेण्याचा उद्देश होता. वाटेत काही वेळा बस थांबली आणि चेतन शर्माने काहीतरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला बसमधून उतरू दिले नाही. त्यांनी स्वत: खाली उतरून खायला आणले.
चेतनच्या प्रशिक्षकाला सांगावे लागले, ४-५ दिवस घरीच राहा
चंदीगडला पोहोचल्यानंतर चेतन शर्मा त्याचे प्रशिक्षक देशप्रेम आझाद यांना भेटायला गेले. आझाद साहेबांनी प्रथम त्याला पुढील ४-५ दिवस घराबाहेर पडू नये अशी सूचना केली. चेतन शर्माने त्यांची आज्ञा पाळली. तो घरी शांतपणे राहत होता. त्यानंतर तीन-चार दिवसांनी देशप्रेम आझाद त्याला आपली अकादमीत बोलावू लागले.
चेतन शर्मा हळूहळू क्रिकेटच्या सरावात परतला. या सामन्यातील पराभवानंतर लगेचच भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर जावे लागले. त्या संघात चेतन शर्माची निवड झाली. पुढच्याच वर्षी चेतन शर्माने विश्वचषकात पहिली हॅटट्रिक घेण्याचा पराक्रमही केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ अभिमानास्पद घटनेस समर्थन करण्यास डी कॉकचा नकार, बोर्डाकडून मोठ्या कारवाईची शक्यता
शाब्दिक युद्धापासून धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंनी मिटवला वाद, प्रशिक्षकांचा खुलासा