भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या शांत आणि साध्या स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे अनेकदा त्याचे कौतुकही झाले आहे. पण धोनीबद्दल एक खास खुलासा भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणने केला होता.
लक्ष्मणने काही दिवसांपूर्वी त्याचे आत्मचरित्र प्रदर्शित केले आहे. त्याच्या या आत्मचरित्राचे नाव ‘281 अँड बियॉन्ड’ असे असून यात त्याने धोनीबद्दलची खास आठवण लिहिली आहे.
लक्ष्मणने म्हटले आहे की, “धोनीबद्दल माझी लक्षात राहिलेली आठवण म्हणजे नागपूरमध्ये माझ्या 100 व्या कसोटी सामन्यात त्याने संघाची बस हॉटेलपर्यंत स्वत: चालवली होती. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. संघाचा कर्णधार मैदानातून संघाला परत घेऊन जात होता.”
“अनिल कुंबळेने निवृत्ती घेतल्यानंतर धोनीचा तो कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. तरीही त्याला जगाची चिंता नव्हती. पण तो तसाच आहे. खेळकर आणि जमिनीवर पाय असलेला. धोनीने कधीही त्याचा आनंद आणि खेळकरपणा हरवला नाही. मी त्याच्यासारख्या व्यक्तीला कधीही भेटलेलो नाही.”
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने निवृत्ती स्विकारल्यानंतर भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्विकारली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेतील 6 ते 10 नोव्हेंबर दरम्यान झालेला सामना चौथा कसोटी सामना हा धोनीचा कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना होता. तर लक्ष्मणचा 100 वा कसोटी सामना होता.
लक्ष्मणने त्याच्या आत्मचरित्रात पुढे म्हटले आहे की, “धोनीची शांतता आणि समोतोलपणा ही खुप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने 2011 च्या इंग्लंड दौऱ्यापर्यंत यशाशिवाय काही पाहिले नव्हते. पण आम्ही इंग्लंड विरुद्ध 4-0 ने पराभूत झालो.”
“तसेच त्याचवर्षी आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्धही तीन कसोटी सामन्यात पराभव स्विकारला होता. आम्ही दोन व्हाईटवॉश स्विकारले होते. मी बाकी खेळाडूंप्रमाणे गोंधळलेलो होतो. पण धोनी शांत होता. तो एकदाही चिडला नाही आणि त्याने कधीही निराश असल्याची किंवा असहाय्य असल्याची छाप ठेवली नाही.”
2011-2012 दरम्यान भारतीय संघाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्विकारावा लागला होता. यामुळे आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानही गमवावे लागले होते.