येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ज्यामुळे न्यूझीलंड संघाला सराव करण्याची संधी मिळणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ थेट १८ तारखेला न्यूझीलंड संघासोबत भिडणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु हे विसरून चालणार नाही की, न्यूझीलंड संघाने २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाकडे बदला घेण्याची एक उत्तम संधी आहे.
विश्वचषक २०१९ स्पर्धेत केले होते पराभूत
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये विश्वचषक स्पर्धेचा सेमी फायनल सामना पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २३९ धावा केल्या होत्या. यामध्ये रॉस टेलरने ७४ धावांची खेळी केली होती. तर कर्णधार केन विलियमसनने ६७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तर भारतीय संघाकडून भुवनेश्वर कुमारने उल्लेखनीय कामगिरी करत ३ गडी बाद केले होते. परंतु या सामन्यात हलक्याशा पावसाचा अडथळा आला आणि सामन्याला वेगळेच वळण लागले.
या मोठ्या सामन्यात भारतीय संघाच्या मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी यांच्या वेगवान गोलंदाजी विरुद्ध भारतीय संचाचा निभाव लागला नव्हता. अवघ्या ५ धावांवर ३ गडी बाद झाल्यानंतर भारतीय संघाचे २५ व्या षटकापर्यंत कशाबशा ८० धावा काढल्या. त्यानंतर एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या जोडीने भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय संघाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. जडेजाची ७७ धावांची खेळी आणि एमएस धोनीची ५० धावांची खेळी व्यर्थ गेली होती.
धोनीचा वनडे क्रिकेटमधील शेवटचा सामना
विश्वचषक २०१९ स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला होता. सामना भारतीय संघाच्या बाजूने वळत असताना मार्टिन गप्टीलने धोनीला धावबाद करत माघारी धाडले होते. ज्यामुळे कॅप्टनकूलला देखील अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसून आला नाही. त्याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
तसेच विराट कोहलीला देखील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव करण्याची संधी असणार आहे. विराट कोहलीला अजुनपर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकण्यात यश आले नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या-
असा प्रतिभाशाली मुंबईकर, ज्याला भारतीय संघ दूरच आयपीएलमध्येही मिळाली नाही पुरेशी संधी
प्रतिभेची खाण! अवघ्या १७ सामन्यात ११७ विकेट्स अन् ६३१ धावा, ‘हा’ अष्टपैलू ठोठावतोय टीम इंडियाचं दार