अहमदाबाद। नरेंद्र मोदी स्टेडियमवर २४ फेब्रुवारीपासून सुरु झालेला भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दिवस-रात्र कसोटी सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. हा सामना केवळ २ दिवसात संपला. त्यामुळे अनेकांनी या सामन्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तसेच हा सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत भारताचा फिरकीपटू आर अश्विनलादेखील खेळपट्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना फटकारले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा अश्विनला खेळपट्टीबद्दल एका इंग्लिश पत्रकाराने प्रश्न विचारला असता अश्विन म्हणाला, ‘चांगली क्रिकेट खेळपट्टी म्हणजे काय? गोलंदाजांना मदत मिळत असताना फलंदाजांना धावा करण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागते. त्याबद्दल कोणतीच शंका नाही. चांगली खेळपट्टी कशी असते? तिची व्याख्या काय? पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत, मग चांगली फलंदाजी करा आणि मग शेवटच्या दोन दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत, हे नियम कोणी बनवले आहेत. आता यातून आपल्याला बाहेर पडले पाहिजे. याबद्दल नेहमीच समस्या उभ्या करुन अर्थ नाही.’
तसेच अश्विनने जेव्हा त्या पत्रकाराला पुढे एक प्रश्न विचारला की तुम्ही पुढील सामन्यातून काय अपेक्षा करता, त्यावर पत्रकार म्हणाला, ‘एक चांगला सामना.’ त्यावर अश्विनने उत्तर दिले की ‘तुम्हाला हिच अपेक्षा असायला हवी, त्यासाठी खेळपट्टीची चिंता नको.’
Ashwin pulls no punches! "What is a good cricket surface and who defines it?," @ashwinravi99 to an English journalist #INDvEND #AhmedabadTest #Pitch pic.twitter.com/pt4cxJZc6A
— Santhosh Kumar (@giffy6ty) February 27, 2021
याबरोबरच अश्विन म्हणाला, ‘मी याआधीपण सांगितले आहे. प्रत्येकाला आपली मते आहेत आणि मी असं म्हणत नाही की तुमची मत चूकीचे की बरोबर आहे. पण सत्य हे आहे की खेळपट्टीबद्दलची चर्चा हाताबाहेर जात आहे. सातत्याने तुम्ही आमच्याशी खेळपट्टीबद्दल कसे प्रश्न विचारू शकता? आम्ही दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या देशात सामना खेळल्यानंतर खेळपट्टीची इतकी चर्चा झाली आहे, अशी उदाहरणे आहेत का?’
तो पुढे म्हणाला, ‘मला कधी कधी हे मजेशीर वाटते की कोणी खेळपट्टीवर बोलले की ते लगेचच आपल्या मीडियामध्ये येते आणि तो एक विषय बनतो. आम्ही न्यूझीलंडला गेला आणि दोन्ही सामने ५ दिवसांच्या आत संपले, त्याबद्दल कोणी काही म्हटले नाही.’
याबरोबरच त्याने म्हटले आहे की ‘विराटचा एक व्हिडिओ आहे, ज्यात तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान म्हटला होता की खेळपट्टीबद्दल बोलण्यासाठी मी येथे आलो नाही आणि मी माझ्या संघाचे सांत्वन करत नाही. याचप्रमाणे आपल्याला असेच क्रिकेट खेळायला शिकवले आहे आणि मला माहित नाही आपण अशा विचारांना कसे काय प्रोत्साहन देतो. म्हणूनच मी म्हटले होते की त्यांना जे विकायचे आहे ते विकू द्या, खरेदी करायचे की नाही ही आपली पसंती आहे.’
https://twitter.com/BCCI/status/1365658192554852353
अश्विन नेहमीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्याने नुकतेच ४०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला आहे. आता भारत विरुद्ध इंग्लंड संघाच उर्वरित शेवटचा कसोटी सामना ४ मार्चपासून होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला” मराठी राजभाषा दिनानिमित्त सचिन तेंडुलकरचं खास ट्विट
‘तो माझ्याजवळ आला होता आणि म्हणाला…’ , सुर्यकुमारने सांगितले रोहितबरोबरची खास आठवण






