भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज कर्णधार लाभले आहेत, ज्यांनी आपल्या नेतृत्वात भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. यात कपिल देव, सौरव गांगुली आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. तसेच भारतीय संघाचे नेतृत्वपद आता विराट कोहलीच्या हाती आहे. विराटने देखील आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. परंतु अनेकदा असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, विराट कोहलीनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे दिली जाईल? यावर भाष्य करत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सलमान बटने काही भारतीय क्रिकेटपटूंची नावे सुचवली आहेत.
पाकिस्तान संघासाठी ३३ कसोटी सामने आणि ७८ वनडे सामने खेळलेल्या सलमान बटला एका चाहत्याने प्रश्न विचारला होता की, विराट कोहलीनंतर भारतीय संघाचे नेतृत्वपद कोणाला दिले जाऊ शकते?
यावर उत्तर देत सलमान बट म्हणाला की, “मी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसह रिषभ पंतची देखील निवड करेल. तसे पाहिले तर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यात आणि विराट कोहलीच्या वयात जास्त साम्य नाही. तर रिषभ पंतकडे अजून भरपूर वेळ आहे. सध्या त्याला घडवण्याचे काम सुरू आहे. ते आयपीएल २०२१ स्पर्धेत, दिसून आले होते. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्वपद देण्यात आले होते.”
रिषभ पंतचे केले कौतुक
रिषभ पंतबद्दल बोलताना सलमान बट म्हणाला, “मी त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी फारसी पाहिली नाही. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत अनुभवी खेळाडू असतानाही त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्वपद दिले गेले होते. यावरून असे स्पष्ट होते की, बीसीसीआयकडे रिषभ पंतबाबत काहीतरी योजना असतील. विराट कोहली सध्या तरुण आहे. तो येणारे ८-९ वर्ष भारतीय संघाचे नेतृत्वपद सांभाळेल.”
रोहित शर्माची देखील केली प्रशंसा
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज आणि आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माचे देखील सलमान बटने तोंडभरून कौतुक केले. त्याने म्हटले की, “रिषभ पंतसोबत रोहित शर्मा देखील एक उत्कृष्ट कर्णधार आहे. खरं सांगायचं तर, रोहित शर्मा माझा आवडता कर्णधार आहे.”
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. आयपीएल इतिहासात रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
अजिंक्य रहाणेचीही केली स्तुती
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. या संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने केले होते. रहाणेबद्दल बोलताना सलमान बट म्हणाला, “नुकतेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवला होता, ज्यात अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले होते. परंतु भारतीय संघाच्या भावी कर्णधारासाठी अजून खूप वेळ आहे. सध्यातरी भारतीय क्रिकेटमध्ये हा चर्चा करण्याचा विषय नाहीये. त्यांच्याकडे ३-४ खेळाडू आहेतच.”
महत्त्वाच्या बातम्या-
मोठा पेच! आयपीएल २०२१चे उर्वरित सामने ‘येथे’ झाल्यास टी२० विश्वचषकाचे आयोजन धोक्यात?
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड बोर्डाचा ‘हा’ मोठा निर्णय
पंतचा कमाल स्टंट; WTC फायनल गाजवण्यासाठी रिषभ ‘असा’ करतोय मेहनत