भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (२८ जून) आयर्लंडविरुद्ध झालेला दुसरा टी२० सामना शेवटच्या षटकात जिंकला आणि मालिका २-० ने खिशात घातली. कर्णधार हार्दिक पंड्या याने नवखा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्याकडून हे महत्त्वपूर्ण षटक करून घेतले. सामन्यानंतर कर्णधार पंड्याने खुलासा केला आहे की, कोणत्या कारणामुळे त्यांनी या नवोदित वेगवान गोलंदाजाला शेवटचे षटक टाकण्यासाठी बोलावण्याचा निर्णय घेतला?
उमरानला (Umran Malik) आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. परंतु या सामन्यात त्याला प्रभावी प्रदर्शन करता आले नव्हते. त्याने या सामन्यातील आपल्या पहिल्याच षटकात १४ धावा दिल्या होत्या. त्यामुळे कर्णधार पंड्याने त्याच्याकडून केवळ १ षटक टाकून घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या टी२० सामन्यातील (IRE vs IND) त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह होते. मात्र या सामन्यात कर्णधार पंड्याने (Captain Hardik Pandya) पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याच्याकडून महत्त्वपूर्ण विसावे षटकही करून घेतले.
भारतीय संघाच्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. मात्र उमरानने अंतिम षटकात १७ धावांचा यशस्वी बचाव केला आणि भारतीय संघाला ४ विकेट्सने सामना जिंकून दिला.
उमरानला शेवटचे षटक देण्यामागचे कारण
उमरानला शेवटचे षटक देण्यामागचे सविस्तर कारण सांगताना पंड्याने म्हटले की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मी अजिबात चिंताग्रस्त नव्हतो. मी उमरानला पाठिंबा दिला कारण त्याच्याकडे गती आहे. त्याच्या गतीमुळे फलंदाजाला त्याच्याविरुद्ध मोठे फटके खेळणे कठीण जाते. म्हणूनच मी हा निर्णय घेतला.”
कसे राहिले शेवटचे षटक?
भारताकडून उमरान शेवटचे षटक फेकत होता, तर आयर्लंडकडून मार्क ऐदेर आणि डॉकरेल फलंदाजी करत होते. या षटकातील पहिला चेंडू उमरानने निर्धाव टाकला. त्यानंतर दुसरा नो बॉल राहिला. फ्रि हीटचा फायदा घेत ऐदेरने सलग २ चौकार मारले. पुढे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर उमरानने प्रत्येकी एक धाव दिली आणि संघाला ४ धावांनी सामना जिंकून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर चा कहर! आता तर थेट विराटचाच विक्रम केलाय स्वत:च्या नावावर
रोहित-राहुल नाही तर ‘ही’ जोडी भारतासाठी ठरलेय सुपरहिट! रचली सर्वात मोठी भागिदारी
टीम इंडियाचं ठरलंय! अशी असेल इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारताची ‘प्लेइंग ११’