एक काळ असा होता जेव्हा पृथ्वी शॉला टीम इंडियाचं भविष्य मानलं जायचं. पृथ्वी शॉबद्दल म्हटलं जायचं की, त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागची झलक पाहायला मिळते. पृथ्वीच्या खेळातही हे दिसून आलं होतं. तो ज्या पद्धतीनं फटके मारायचा, ते चाहत्यांना सचिन आणि सेहवागची आठवण करून देत असे. पृथ्वी शॉ हा प्रतिभावान खेळाडू आहे यात शंकाच नाही, मात्र तो लहान वयात मिळालेलं स्टारडम सांभाळू शकला नाही. त्याचा परिणाम असा झाला की तो आता आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला आहे!
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पृथ्वी शॉनं स्वतःची बेस प्राईज 75 लाख रुपये ठेवली होती. या सलामीवीर फलंदाजावर काही संघ नक्कीच बोली लावतील, असं मानलं जात होतं. मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली की, कोणत्याही संघानं पृथ्वीवर विश्वास दाखवला नाही. यावर आता भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक मोहम्मद कैफ यांनं आपलं मत मांडलं आहे. लिलावात पृथ्वीवर कोणत्याच संघानं बोली का लावली नाही, याचं कारण कैफनं सांगितलं.
मोहम्मद कैफ एकेकाळी दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य होता. शॉ आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळला आहे. कैफनं पृथ्वीबद्दल काही गोष्टी शेअर केल्या, ज्या खूपच आश्चर्यकारक आहेत. कैफ म्हणाला, “एकवेळ टीम मॅनेजमेंट पृथ्वीबाबत खूपच कठोर झाली होती. त्याला संघातून वगळण्यावर सर्वांचं एकमत झालं होतं. मात्र सामन्याच्या आधी प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना वाटायचं की, पृथ्वीनं आजच्या सामन्यात चांगली कामगिरी केली तर आपण जिंकू. यामुळे पृथ्वीला लागोपाठ अनेक संधी मिळाल्या. पण तो आपल्या खेळात सुधारणा करू शकला नाही.”
कैफ म्हणाला, ‘पृथ्वीमध्ये चांगलं खेळण्याची क्षमता नव्हती असं नाही. त्यानं एकदा 6 चेंडूत 6 चौकारही मारले आहेत. मात्र, कालांतरानं त्यानं आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं नाही. याशिवाय इतरही अनेक गोष्टी होत्या, ज्याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला. याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. पृथ्वी शॉसाठी ही लाजीरवाणी बाब आहे”, असं कैफनं नमूद केलं.
हेही वाचा –
भारतीय संघाला मोठा धक्का! महत्त्वाचा फलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या बजरंग पुनियावर 4 वर्षांची बंदी, कारण धक्कादायक!
पाकिस्तानात हिंसाचार, श्रीलंकेनं मालिका अर्धवट सोडली; इम्रान खान समर्थकांचा गोंधळ