काही दिवसांपूर्वीच आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. ही स्पर्धा रवी शास्त्री यांच्या साठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा ठरली होती. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या जोडीने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. मायदेशातच नव्हे तर परदेशात देखील या जोडीने भारतीय संघाला विजय मिळवून दिले होते. आता मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये इतका यशस्वी खेळाडू का आहे? याचा खुलासा केला आहे.
रवी शास्त्री यांनी जेफरी आर्चर यांच्या पॉडकास्टला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “मला तर असे वाटते की, गेल्या ५ वर्षात ज्या संघाने कसोटी क्रिकेटवर अधिराज्य गाजवले आहे, तो संघ भारतीय संघ आहे. विराट कसोटी क्रिकेटची पूजा करतो. तसेच संघातील इतर खेळाडू देखील कसोटी क्रिकेटची पूजा करतात. ही गोष्ट जगासाठी आश्चर्यकारक असू शकते कारण, भारतीय संघ भरपूर प्रमाणात एकदिवसीय क्रिकेट आणि नंतर आयपीएल सामने खेळतो.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “जर तुम्ही संघातील खेळाडूंना विचाराल, तर ९९ टक्के खेळाडू कसोटी क्रिकेट माझी पहिली पसंद आहे,असे म्हणतील. हेच मुख्य कारण आहे की, भारतीय संघाने गेल्या ,५ वर्षात घवघवीत यश मिळवले आहे. याच कारणामुळे भारतीय संघ गेल्या ५ वर्षांपासून पहिल्या स्थानी टिकून आहे.”
“आपण न्यूझीलंड विरुद्धच्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झालो असलो. तरीदेखील गेली ५ वर्ष भारतीय संघाने कसोटी स्वरूपात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन विजय मिळवला. आम्ही इंग्लंडमध्ये देखील आघाडीवर होतो. आम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील जगभरात जाऊन विजय मिळवतोय. आता वेगवान गोलंदाजांची कमतरता नाहीये. यापूर्वी असे होत नव्हते. हे अप्रतिम आहे.” असे रवी शास्त्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
शतकांचा दुष्काळ कधी संपणार ? विराटने दिले ‘हे’ उत्तर
‘तू खूप लकी आहे की, मी तुझी बहिण आहे’, बड्डे बॉय श्रेयसला बहिणीकडून गमतीशीर पण प्रेमळ शुभेच्छा
आर अश्विनची बातच न्यारी!! ‘असा’ कारनामा करत कुंबळे-मुरलीधरनसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान