---Advertisement---

ओबेड मॅकॉयने लगावला विकेट्सचा ‘षटकार’, बनलाय भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 11:41 AM
Obed McCoy
---Advertisement---

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ ५ विकेट्सने पराभूत झाला. मालिकेतील पहिला सामना संघाने ६८ धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला होता, पण दुसऱ्या सामन्यात संघ अशी कामगिरी करू शकला नाही. विशेषतः भारतीय संघाचा फलंदाजी क्रम या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. फलंदाजांना झटपट बाद करण्याचे श्रेय वेस्ट इंडीजच्या ओबेड मॅकॉय याला जाते. मॅकॉयने या टी-२० सामन्यात भारतीय संघाविरुद्ध इतिहासातील सर्वात्तम गोलंदाजी प्रदर्शन केले.

वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉय (Obed McCoy) याने भारताविरुद्धच्या या दुसऱ्या टी-२० सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली.  त्याने या सामन्यात टाकलेल्या ४ षटकांमध्ये १७ धावा खर्च करून भारताच्या ६ विकेट्स घेतल्या. यादरम्यान मॅकॉयने एक निर्धाव षटक देखील टाकले. या जबरदस्त प्रदर्शासाठी त्याला सामनावीर निवडले गेले आणि सोबतच त्याच्या नावापुढे एका मोठ्या विश्वविक्रमाची नोंद देखील झाली.  मॅकॉय असा पहिलाच गोलंदाज बनला आहे, ज्याने एखाद्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताच्या ६ विकेट्स घेतल्या आहेत.

भारताविरुद्ध खेलेल्या टी-२० सामन्यांत यापूर्वी सर्वोत्तम प्रदर्शन श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाच्या नावावर होते. हसरंगाने २०२१ मध्ये खेळलेल्या या सामन्यात ९ धावा खर्च करून  भारताच्या ४ खेळाडूंना बाद केले होते. यापूर्वी भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यात जगातील एकाही गोलंदाजाने पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या नव्हता. मात्र, मॅकॉयने एक पाऊल पुढे टाकत सोमवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात तब्बल ६ खेळाडूंना बाद केले. मॅकॉयच्या या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाला सामन्यातील संपूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत.

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली असून संघ अवघ्या १३८ धावांवर गुंडाळला गेला. सलामीसाठी आलेला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मॅकॉयने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनीही मॅकॉयच्याच चेंडूवर विकेट मागवल्या.

भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडीजसाठी सोपे वाटत होते. परंतु भारतीय गोलंदाजांनी देखील चांगले प्रदर्शन केले आणि शेवटच्या षटकापर्यंत आव्हान दिले. वेस्ट इंडीजने १९.३ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर हा सामना जिंकला. ब्रँडन किंगने ५२ चेंडूत ६८ धावा ठोकत वेस्ट इंडीजला चांगली सुरुवात दिली. परंतु, भारताचे सलामीवीर अशी सुरुवात देऊ शकले नाहीत. सलामीवीर जोडी बाद झाल्यानंतर भारताचे इतर खेळाडूंही एकापाठोपाठ विकेट्स गमावत गेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

दुसरा टी-२० सामना गमावल्यामुळे सुटला रोहितचा संयम, वाचा कुणावर फोटले पराभवाचे खापर

मेकॉय पुढे टीम इंडियाची वाताहात! दुसरा टी२० जिंकत यजमानांनी मालिका आणली बरोबरीत

रोहितने अविश्वास दाखवलेल्या खेळाडूने ठोकले तब्बल ४० षटकार; स्ट्राईक रेट होता…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---