अॅडलेड। भारतीय संघाची आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा अॅडलेड येथे होणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी तेथील खेळपट्टी तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
अॅडलेडमधील या खेळपट्टीबद्दल पिच क्यूरेटर, डॅमिएन हफ यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की जरी हा सामना दिवसा खेळला जाणार असला तरी या खेळपट्टीवर थोडे गवत ठेवण्यात येणार आहे.
मागील तीन मोसमात अॅडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी सामने झाले आहेत. भारतानेही हा दिवस रात्र सामना खेळावा अशी क्रिकेट आॅस्ट्रेलियाची इच्छा होती. परंतू भारताने यासाठी नकार दिला आहे.
हफ यांनी ‘द विकेंड आॅस्ट्रेलियनशी’ बोलताना माहिती दिली आहे की ‘आम्ही काही वेगळे करत नाही. तयारी सारखीच आहे. फरक एव्हढाच आहे की सामन्याला सकाळी लवकर सुरुवात होईल आणि संध्याकाळी लवकर खेळ थांबवावा लागेल.’
‘आम्ही लाल चेंडूच्या आणि गुलाबी चेंडूच्या (दिवस-रात्र कसोटी) सामन्यासाठी शिल्ड लेव्हलला(आॅस्ट्रेलियातील देशांतर्गत शिल्ड स्पर्धा) सारखीच तयारी करतो. सामन्यात बरोबरीचा खेळ होण्यासाठी थोडे गवत ठेवणे हा चांगला मार्ग आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये समतोलपणा ठेवता येतो.’
खेळपट्टीवर गवत राहिल्याने भारत आणि आॅस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार आहे, हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आॅस्ट्रेलियाच्या जोश हेजलवून, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स अशा वेगवान गोलंदाजांचा सामना करण्याची तयारी करावी लागणार आहे.
त्याचबरोबर भारताकडेही जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि इशांत शर्मा अशी वेगवान गोलंदाजांची चांगली फळी आहे.
याआधी आॅस्ट्रेलियाचा माजी महान कर्णधार रिकी पॉटिंगनेही या मालिकेसाठी खेळपट्टीवर गवत ठेवण्याची पिच क्यूरेटर्सला विनंती केली होती. तसेच त्याने म्हटले होते की गवत असलेल्या खेळपट्टीवर सामना पहायला आवडेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग कोहलीचा निर्धार पक्का, मालिका जिंकणारच
–तो खास पराक्रम करण्यासाठी बांगलादेशला खेळावे लागले तब्बल ११२ कसोटी सामने
–दक्षिण आफ्रिकेच्या स्टेनगनचे ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेबद्दल मोठे वक्तव्य