-आदित्य गुंड
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजवर ११ विश्वचषक झाले आहेत. या ११ पैकी ५ विश्वचषक एकट्या ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया खालोखाल भारत आणि वेस्टइंडीज यांनी प्रत्येकी २ विश्वचषक जिंकले आहेत. वेस्टइंडीजने टी-२० मध्येही दोन विश्वचषक जिंकलेले आहेत.
एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आजवर झालेल्या विश्वचषकाच्या विजेत्यांकडे नजर टाकली तर गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या पाच देशांपैकी चौघांनी टी-२० विश्वचषकही जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक पाचवेळेस जिंकला असला तरी त्यांना टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. तर क्रिकेटचे उद्गाते इंग्लंडला आजवर एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यांनी एक टी-२० विश्वचषक मात्र जिंकला आहे.
भारत मात्र या सगळ्या विश्वविजेत्यांमध्ये एका विशेष कारणाने उजवा आहे असे म्हणता येईल. भारताने २०,५० आणि ६० अशा तीनही प्रकारांच्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवलेले आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा एकमेव देश आहे. वेस्टइंडीजने २० आणि ६० षटकांचे विश्वचषक जिंकलेले आहेत तर पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांनी २० आणि ५० षटकांचे विश्वचषक जिंकलेले आहेत. २०,५० आणि ६० षटकांच्या क्रिकेटचे विश्वचषक जिंकणारा भारत एकमेव संघ आहे.