महिला आयपीएल अर्थातच डब्ल्यूपीएल २०२६च्या हंगामाची सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) धमाक्यात केली आहे. त्यांनी सलग पाच सामने जिंकत प्लेऑफ्सचे तिकिट मिळवले आहे. यामुळे त्यांचे १० अंक झाले असून दुसरीकडे बाकीच्या ४ संघांनी केवळ ४ अंक प्राप्त केले आहेत.
आरसीबीने सोमवारी (१९ जानेवारी) गुजरातला ६१ धावांनी पराभूत करत प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला आहे. आरसीबीचा फॉर्म असाच कायम राहिला तर बाकीच्या संघांना त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण या हंगामात आरसीबीचे अजून तीन सामने शिल्लक आहेत.
आयपीएलच्या या हंगामात गुणतालिकेत आरसीबीनंतर मुंबई इंडियन्सचा क्रमांक लागतो. त्यांनी ५ पैकी २ दोन सामने जिंकत ४ गुण मिळवले आहेत. युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांनीही दोन सामने जिंकले आहेत, मात्र मुंबईचा नेट रनरेट उत्तम असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत. यामध्ये युपी तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या स्थानावर आहेत.
दिल्ली कॅपिट्लची स्थिती मात्र गंभीर आहे. ते गुणतालिकेत दोन अंकासह तळाशी आहेत. त्यांनी ४ सामन्यांत एकच विजय मिळवला आहे. यामुळे कर्णधार जेमिमा रोड्रिग्जला संघाला विजय मिळवून देण्यात अधिक प्रयत्न करावे लागतील. तसेच आता सर्व संघांचे तीन-तीन सामने बाकी असून त्यामध्ये विजय मिळवत प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी मुंबईसह युपी, गुजरात आणि दिल्लीला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.
डब्ल्यूपीएलचा हा चौथा हंगाम आहे. २०२३मध्ये पहिला हंगाम खेळला गेला त्यामध्ये मुंबईने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आरसीबीने चषक जिंकण्याची कामगिरी केली. २०२५मध्ये पुन्हा मुंबई जिंकली होती.
यंदा आरसीबीच्या पाचही सामन्यांत पाच वेगवेगळे ‘प्लेयर ऑफ द मॅच’ खेळाडू ठरले. त्यांचा हा जबरदस्त फॉर्म पाहता ते पुन्हा विजेतेपदावर आपले नाव कोरणार की स्पर्धेला नवा विजेता संघ मिळेल याकडे लक्ष आहे.
या स्पर्धेचा अंतिम सामना ५ फेब्रुवारीला वडोदरामध्ये खेळला जाणार आहे.






