विमेन्स प्रीमियर लीगचा (WPL) थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ग्रुप स्टेजमधील आता फक्त शेवटचा सामना शिल्लक आहे, जो दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. पॉइंट्स टेबलचा विचार केला तर एलिमिनेटरच्या एका जागेसाठी तीन संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. RCB संघाने आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर गुजरात जायंट्सने एलिमिनेटरमध्ये आपली जागा पक्की केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) एलिमिनेटरमध्ये जागा मिळवण्यासाठी फक्त शेवटचा सामना जिंकणे आवश्यक आहे. जेमिमाच्या नेतृत्वाखाली संघाने या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत 7 पैकी 3 सामने जिंकले असून 4 सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. जर दिल्लीने यूपीविरुद्धचा सामना जिंकला, तर ते थेट एलिमिनेटरसाठी पात्र ठरतील. अशा वेळी मुंबई आणि यूपीसाठी पात्रतेचे सर्व दरवाजे बंद होतील.
यूपी वॉरियर्सला (UP warriors) जर एलिमिनेटरसाठी पात्र व्हायचे असेल, तर त्यांना दिल्लीविरुद्धचा सामना केवळ जिंकून चालणार नाही, तर तो किमान 150+ धावांच्या फरकाने जिंकावा लागेल. किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना 18 षटके शिल्लक असतानाच विजय मिळवावा लागेल. हे समीकरण पाहता यूपीसाठी एलिमिनेटर गाठणे आता खूपच कठीण दिसत आहे.
मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) या सामन्याकडे बारीक लक्ष असेल. जर दिल्लीचा संघ हा सामना हरला आणि यूपीला देखील आवश्यक रन-रेट गाठता आला नाही, तर मुंबईला थेट एलिमिनेटरमध्ये जागा मिळेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने या मोसमात 8 पैकी फक्त 3 सामन्यांत विजय मिळवला आहे.






