शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघांची घोषणा केली गेली. दोन्ही संघात अनेक युवा खेळाडूंना देखील संधी मिळालीये. कसोटी संघात मुंबईचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याची निवड झाली. त्यानंतर त्याने आपल्या या प्रवासात राजस्थान रॉयल्सने कशी मदत केली याबाबत खुलासा केला.
देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये धावांचा अक्षरशः रतीब घातल्यानंतर यशस्वी जयस्वाल याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. मागील वर्षी देशांतर्गत हंगामात त्याने सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. तसेच आयपीएलमध्ये तो उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरलेला. हा सर्व विचार करत त्याला आता कसोटी संघात संधी मिळाली आहे. चेतेश्वर पुजाराच्या जागी तो तिसऱ्या स्थानी फलंदाजी करताना दिसू शकतो.
यशस्वी मागील चार वर्षापासून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळत आहे. या संघाने आपल्याला खूप मदत केल्याचे तो म्हणाला. त्याने सांगितले,
“मला राजस्थान रॉयल्सने प्रत्येक गोष्टीत खूप पाठिंबा दिला आहे. माझे सर्व अर्थ नियोजन देखील तेच करतात. पैशाची गुंतवणूक कोठे करावी याबाबत त्यांनी मला वेळोवेळी सल्ला दिला आहे. त्यामुळे मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकलो. या सर्वांसाठी मी नेहमी त्यांचा ऋणी राहील.”
यशस्वी नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडू ठरला होता. राजस्थानसाठी सलामीवीर म्हणून खेळताना त्याने 14 सामन्यांमध्ये 48 च्या दमदार सरासरीने 625 धावा केल्या. यामध्ये एक शतक व चार अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएल इतिहासात कोणत्याही अनकॅप्ड कॅप खेळाडूने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यानंतर त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी स्टँड बाय म्हणून देखील निवडले गेलेले.
(Yashasvi Jaiswal thankful to Rajasthan Royals for support)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मोठा धक्का, आशिया चषकातून ‘हा’ हुकमी एक्का बाहेर! लगेच वाचा
सरफराजची टीम इंडियात निवड न होण्यामागील मोठे कारण आले समोर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वाचला चुकांचा पाढा