भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळत असून त्याने आयसीसी विश्वचषकासाठी भारतीय संघात परतण्याची इच्छा दर्शवली आहे.
“क्रिकेटने मला सर्वकाही दिले आहे. यामुळे मला उत्तम फॉर्ममध्ये असताना क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची आहे.”, असे युवराज म्हणाला.
भारताने जिंकलेल्या 2011च्या विश्वचषकात युवराजने महत्त्वाची भुमिका पार पाडली होती.
डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या आयपीएल 2019च्या लिलावात युवराजला मुंबई इंडियन्सने 1 कोटी या त्याच्या मुळ किंमतीत संघात सामील करुन घेतले आहे.
युवराज सध्या रणजी ट्रॉफीमध्ये कोलकाता येथे सुरू असलेल्या बंगाल विरुद्ध पंजाब या सामन्यात खेळत आहे. या सामन्यानंतरच्या त्याच्या योजनेबद्दलही त्याने माहिती दिली आहे.
“रणजीमधील हा आमचा शेवटचा साखळी सामना आहे. यानंतर राष्ट्रीय टी20 स्पर्धा आणि आयपीएल सुरू होत असल्याने यामध्ये मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे”, असेही युवराज म्हणाला.
नुकतेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका जिंकल्याने युवराजने संघाचे अभिनंदन केले आहे. त्यानेही 2003-04 आणि 2007-08 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवुनही किंग कोहली आहे नाराज