मुंबई । इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीग मानली जाते. या आयपीएलने अनेक खेळाडूंचे आयुष्य बदलवून टाकले आहे. आयपीएलमुळेच भारतासह इतर अनेक देशांना दर्जेदार खेळाडू मिळाले.
नुकतेच भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघात सामील झाल्यानंतर आपले भाग्य उजळल्याची कबुली दिली आहे. चहलने 2011 साली मुंबई इंडियन्समधून आयपीएलला सुरुवात केली होती. मात्र त्याला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. 2014 साली तो आरसीबीच्या संघात दाखल झाला.
चहल एका यूट्यूब चॅनलशी बोलताना म्हणाला की “आयपीएलमधील आरसीबी संघाचा सदस्य बनल्यानंतर माझ्या कारकीर्दीत एक सकारात्मक परिवर्तन घडून आले. त्या वर्षी आयपीएल दुबईमध्ये (सुरुवातीचे काही सामने) झाले होते. ड्रेसिंग रूममध्ये एक दोन खेळाडूंनाच मी ओळखत होतो. माझ्यासोबत हरियाणाचा हर्षल पटेल देखील संघात होता. मी त्याच्याशी बोलत होतो. तो माझा रूममेट होता. त्यानंतर माझ्या जीवनात अनेक बदल घडले.”
तो म्हणाला, “विराट कोहली, डॅनियल विटोरी, एबी डीव्हिलियर्स यांच्या सोबत राहिल्याने मला खूप आनंद व्हायचा. याशिवाय मी रवी रामपॉलला देखील ओळखतो. जो पहिल्यापासून आरसीबीच्या संघात होता.”
चहल सध्या जगातील टॉप फिरकीपटूपैकी एक आहे. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेट सामन्यातील बहारदार कामगिरीनंतर चहल ला 2016 साली भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
चहलने आतापर्यंत 52 वनडे सामन्यात 91तर 42 टी20 सामन्यात 55 बळी टिपले आहेत. आरसीबीकडून खेळताना 83 सामन्यात 100 बळींची नोंद त्याच्या नावावर आहे. 29 वर्षीय चहलने 2015 साली आयपीएलच्या 15 सामन्यात त्याने 12.21 च्या सरासरीने 23 बळी टिपले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
गावसकरांचा ‘तो’ सल्ला पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गजासाठी ठरला मौल्यवान