---Advertisement---

झिम्बाब्वेतही टीम इंडियाची बल्ले-बल्ले; पहिली वनडे १० गड्यांनी खिशात

On: गुरूवार, ऑगस्ट 18, 2022 6:37 PM
Shubman Gill & Shikhar Dhawan
---Advertisement---

भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या (ZIMvsIND) पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. भारताने गुरूवारी (१८ ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे झालेल्या पहिल्या वनडेत १० विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. यामुळे भारत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० असा पुढे आहे. या सामन्यात भारताने १९० धावांचा पाठलाग करताना एकही विकेट न गमावता ३०.५ षटकातच लक्ष्य गाठले आहे. या सामन्यात भारताच्या आधी गोलंदाज आणि नंतर फलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाचा विजय पक्का केला.

या सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी चमकदार खेळी केली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) याने ११३ चेंडूत ९ चौकार फटकारत नाबाद ८१ धावा केल्या आहेत. तर शुबमन गिल (Shubman Gill) यानेही त्याला उत्तम साथ दिली. त्याने ७२ चेंडूत १० चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ८२ धावा केल्या आहेत. केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच विजय ठरला आहे.

तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरवत गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहर (Deepak Chahar) याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्याने ७ षटकात २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत. चाहरला बाकी गोलंदाजांची चांगली साथ लाभली आहे. प्रसिध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी देखील ३-३ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.

झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगिस चकाब्वा याने संघाकडून सर्वाधिक अशा ३५ धावा केल्या. संघाची स्थिती कठीण असताना त्याने सिंकदर रजासोबत पाचव्या विकेटसाठी ३६ चेंडूत ३५ धावांची भागीदारी केली. त्यांची जोडी प्रसिधने तोडली. त्याने रजाला १२ धावांवर बाद केले. भारत लवकरच यजमान संघाला सर्वबाद करण्याच्या तयारीत असताना ब्रॅड इव्हान्स आणि रिचर्ड नगारावा यांनी विशेष खेळी केली.

ब्रॅड इव्हान्स आणि रिचर्ड नगारावा यांनी नवव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली आहे. इव्हान्सने नाबाद ३३ आणि नगारावाने ३४ धावा केल्या आहेत. यामुळे झिम्बाब्वेने ४०.३ षटकात सर्वबाद १८९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. धवन आणि गिल यांच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताने पहिला सामना सहज जिंकला आहे.

या मालिकेतील दुसरा वनडे सामना शनिवारी (२० ऑगस्ट) खेळला जाणार आहे. हा सामनाही हरारे येथेच खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेटचा ‘राजा बाबू’! एका पायावर मारले तब्बल ७० षटकार; आता सरकारकडून आहे अपेक्षा

‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच

थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---