---Advertisement---

भारताचे पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे…

---Advertisement---

भारतीय कुस्ती क्षेत्रात ‘हिंद केसरी’ हा एक मनाचा आणि प्रतिष्ठेचा विषय आहे. मल्ल हा किताब मिळण्यासाठी त्यांच्या कुस्ती कारकिर्दीत जीवाचे रान करतात. समाजात आणि एकूणच कुस्ती क्षेत्रात हिंद केसरी विजेत्या मल्लाकडे एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून पहिले जाते. पुण्यात ह्याच हिंद केसरी स्पर्धेचे ५०वे अधिवेशन होत आहे. आजपर्यंत झालेल्या ४९ हिंद केसरी स्पर्धांमध्ये महाराष्ट्रीयन मल्लांनी तब्बल ८ वेळा हा ‘किताब आणि मानाची गदा पटकावली आहे. ऐकून विशेष वाटेल परंतु देशातील पहिला हिंद केसरी होण्याचा मानही एका मराठी मातीतील मल्लाला मिळाला. १९५९ साली पहिली हिंद केसरी स्पर्धा पार पडली.

श्रीपती शंकर खंचनाळे यांचा जन्म दिनांक १० डिसेंबर १९३४ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. मराठी माध्यमातून त्यांनी त्यावेळी ७वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. कृष्णा नदीकाठच्या ज्या गावात खंचनाळे यांचा जन्म झाला ते दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध होते त्यामुळे गावातील मुले मुळातच शरीराने राकट आणि कणखर होती. श्रीपती खंचनाळे यांनी पुढे जाऊन मोठे कुस्तीपटू होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे अशा गावात अर्थात याकसंभा, चिक्कोडी या बेळगाव जिल्ह्यात त्यांचं गेलेलं बालपण.

हीच ती तालीम जिथे हिंद केसरी श्रीपती खंचनाळे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 

खंचनाळे यांची लहानपणी एक खोडकर आणि एक चंचल मुलगा अशीच ओळख असल्या कारणाने शिक्षणात ते विशेष काही खास नव्हते. त्यांना त्यात रसही नव्हताच. परंतु मुलाचे एकंदरीत खेळावरील प्रेम पाहून आई-वडिलांनी खंचनाळे यांना मोठा पाठिंबा दिला. ग्रामीण मध्यम वर्गीय कुटुंब असल्या कारणाने सुरुवातीच्या काळात त्यांनी असंख्य आर्थिक अडचणी पहिल्या. शाळेत शिकत असतानाच त्यांनी कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. त्यावेळीच कोल्हापूर येथील महान मल्ल मल्लापा थडके आणि विष्णू नगराळे यांचा विशेष प्रभाव खंचनाळे यांच्यावर होता.

याकसंभा हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. कोल्हापूरच्या राज्याच हे राज्य असल्यामुळे तिथे मराठीचा प्रभाव आजही टिकून आहे. त्यावेळी शाळेमध्ये शारीरिक शिक्षण अथवा क्रीडा हा विषय नव्हता परंतु शिक्षकही ह्या विषयात आनंद घेत असल्यामुळे खंचनाळे यांची यातील प्रगती पाहून ते आनंदी असत. ७वी पर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी सॅन १९४८ साली शिक्षण थांबवले. त्यांना मराठी, हिंदी, कन्नड आणि पंजाबी भाषेचं चांगलं ज्ञान असून त्यावर प्रभुत्वही आहे. त्यांनी शाळा सोडण्याचं मुख्य कारण हे कुस्ती असाच होत.

हिंद केसरी श्रीपती खंचनाळे यांचा रोजचा व्यायाम…

तीन वर्ष याकसंभा या गावीच सराव केल्यानंतर त्यांनी गावाबाहेर माथा तालीम येथे सर्व करायला सुरुवात केली. सकाळी ४ ते ७ आणि दुपारी ३-६ असा नित्याचा सराव करून एका मोठ्या हिंद केसरीच्या जडणघडणीला ५०च्या दशकात सुरुवात झाली होती. त्यांनी ७ व्या वर्षी सुरु केलेली कुस्ती वयाच्या ४५ व्या वर्षी खेळणे बंद केले.

जगभरात कुस्तीची पांढरी म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर हे याकसंभा गावापासून जेमतेम ३० किलोमीटरवर होते. कोल्हापूरचा राजाच स्वतः मल्ल असल्यामुळे कोल्हापूरमध्ये त्यावेळी कुस्तीचं मोठं वातावरण होत. दर १५-२० दिवसांनी मोठ्या प्रमाणावर शहरात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मल्लांच्या कुस्तीच्या स्पर्धा होत असत. आज आपले खेळाडू जे आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायचं कौतुक सांगतात ते त्यावेळी कोल्हापूरच्या महाराजांमुळे तरुण मल्लांना मिळत असे.

१९५८ साली कोल्हापूरमधील खासबाग मैदानात पाकिस्तानी मल्ल सादिक बरोबरीला लढतीपूर्वीचे छायाचित्र 

१९५० सालापासून खंचनाळे यांनी कुस्ती खऱ्या अर्थाने गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यांचे आदर्श असणाऱ्या आणि ज्यांच्यामुळे ते या क्षेत्रात आले अश्या असंख्य मल्लांबरोबर त्यांनी कुस्ती खेळल्या. चपळता, वेग, ताकद ह्या कुस्तीसाठी अतिशय महत्वाच्या गोष्टी. खंचनाळे ह्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी त्यावेळी ३वाजता उठत असत. तब्बल ३००० बैठका, ३००० जोर, अर्धा तास माती खणणे हे झाल्यावर मल्लखांब अशा गोष्टी ते करत असत.

१९५९ साली त्यांनी त्यावेळचा पंजाब केसरी असलेल्या बनाता सिंगवर मात करून हिंद केसरी हा ‘किताब मिळवला होता. त्याच वर्षी त्यांनी आनंद शिरगावकर यांना कऱ्हाड येथे २मिनिटात हरवून मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. १९५८ (बेळगाव), १९६२(जबलपूर) आणि १९६५ (बेंगलोर) या ठिकाणी झालेल्या ऑल इंडिया कुस्ती चॅम्पिअनशिप जिंकल्या होत्या. त्यात त्यांनी पंजाब, बंगाल आणि भारतीय आर्मीच्या तगड्या मल्लांना धूळ चारली होती.

पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे त्यांच्या विविध पारितोषिकांसमवेत 

त्यावेळी पंजाब आणि पाकिस्तान प्रांतातील मल्ललांचा एक दरारा होता. अशा कालखंडात खंचनाळे यांनी त्यांना पराभवाची चव चाखायला लावली होती.

त्यांना त्यांच्या याच कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न, एकलव्य पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या एका शिष्याने तब्बल ५ वेळा हिंद केसरी हा ‘किताब जिंकला तर अन्य चौघांपैकी एकाने हिंद केसरी तर तिघांनी महाराष्ट्र केसरी ‘किताब जिंकला. कुस्ती खेळणं सोडल्यांनंतर त्यांनी कुस्ती क्षेत्रातच विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. त्यात प्रशिक्षक म्हणून त्यांनी असंख्य मल्ल घडविले. त्यांनी पंच म्हणूनही असंख्य स्पर्धामध्ये पंचगिरी केली. त्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अध्यक्ष म्हणून तब्बल २० वर्ष जबाबदारी पार पाडली.

त्यांच्या निवृत्तीनंतर काही वर्षांनी महाराष्ट्र सरकारने त्यांना कोल्हापूर शहरात रुहीकर कॉलनीमध्ये घर दिले तसेच दर महिन्याला त्यांना सरकारकडून ३००० रुपये मानधन दिले जाते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment