---Advertisement---

बुमराहसोबतच्या जुगलबंदीचे शमीने उलगडले रहस्य, आगामी सामन्यांसाठीची योजनाही केली स्पष्ट

On: बुधवार, जुलै 13, 2022 6:55 PM
Jasprit Bumrah Mohammed Shami Rohit Sharma Rishabh Pant
---Advertisement---

केनिंग्टन, द ओव्हल या मैदानावर झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) पहिल्या वनडे सामन्यात भारताने बाजी मारली आहे. हा सामना भारताने १० विकेट्सने जिंकला आहे. यामुळे भारत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अविश्वसनीय ठरली आहे. त्यातच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी यजमान संघाला सळो की पळो करून सोडले. तसेच शमीने पुढील सामन्याची योजनाही स्पष्ट केली आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा तो निर्णय योग्य ठरवत भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला २५.२ षटकांतच सर्वबाद करत ११० धावांवर रोखले. बुमराहने इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत त्यांना चांगलाच त्रास दिला आहे. त्याने ७.२ षटकातील ३ षटके निर्धाव टाकली आहेत. यावेळी त्याने १९ धावा देत ६ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याची ही वनडेतील सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली आहे.

बुमराह बरोबरच मोहम्मद शमी (Mohammed Shami) यानेही ७ षटकात ३१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारतीय वनडे संघात तीन वर्षानंतर पुनरागमन केले आहे. सामन्यानंतर त्याने म्हटले, विकेट्स घेण्याचा प्रयत्न नव्हतो करत, मात्र गोलंदाजी अधिक चांगली व्हावी यावर सगळे लक्ष होते. बुमराहबरोबर गोलंदाजी करताना कसा अनुभव आला याबाबत विचारले असता तो म्हणाला, “आता एकत्र खेळून खूप काळ झाला आहे. आम्हाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी दोन शब्दच पुरे असतात.”

शमीने आगामी वनडे सामन्यांसाठीची त्याची रणनीती स्पष्ट केली आहे. यावेळी तो म्हणाला, “जर खेळपट्टी वेगळी असेल तर आम्हाला आमच्या गोलंदाजीत बदल करावा लागेल. पहिल्या वनडेमध्ये मिळालेले यश आणि आत्मविश्वास पुढचा सामन्यात उपयोगी ठरणार आहे.”

शमीने या सामन्यातून त्याच्या वनडे कारकिर्दीतील १५० विकेट्सचा आकडा पार केला आहे. तो भारताकडून जलद १५० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ८० सामन्यांतच ही कामगिरी पूर्ण करताना अजित आगरकरला मागे टाकले आहे. आगरकरने ९७ सामन्यात ही कामगिरी केली होती. आता शमीच्या खात्यात ८० सामन्यात १५१ विकेट्स पूर्ण झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शमी वनडेमध्ये जलद १५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने ७७ सामन्यात, पाकिस्तानचा सक्लेन मुश्ताकने ७८ आणि अफगाणिस्तानच्या राशिद खानने ८० सामन्यात ही कामगिरी केली आहे.

पहिल्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहितने नाबाद ७६ आणि शिखर धवनने नाबाद ३१ धावा केल्या. इंग्लंडला प्रथमच एखाद्या संघाने वनडेमध्ये द ओव्हलवर १० विकेट्सने पराभूत केले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा वनडे सामना १४ जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘मैदानातही आणि मैदानाबाहेरही डक’! बुमराहची पत्नी संजनाने इंग्लिश फलंदाजांना केले ट्रोल

‘एलेक्सा, प्लीज प्ले जसप्रीत बुमराह’, भारताच्या माजी क्रिकेटपटूच ट्वीट होतंय व्हायरल

आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---