सन 2002 मध्ये टीम इंडियाने नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली. सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फिरवला. टेस्ट सीरिज सुरू झाल्यावर जॉन राईट आणि सौरव गांगुली या जोडीने भारतीय क्रिकेटला एक भेट दिली, टेस्ट ओपनर वीरेंद्र सेहवाग. सेहवागने लॉर्ड्सवर 84 आणि नॉटिंगहॅममध्ये शतक ठोकलं. दुर्दैवाने दोन्ही मॅचमध्ये टीम इंडियाला विजयाची चव चाखता आली नाही. पराभूत लॉर्ड्सवर अजित आगरकरने आणि ड्रॉ नॉटिंगहम टेस्टमध्ये सेहवागसह द्रविडने शतक ठोकले. इंग्लंड सीरिजमध्ये आघाडीवर होता.
तिसरी मॅच हेडिंग्ले येथे होणार होती. मॅचच्या दोन दिवस आधी जेफ्री बॉयकॉट यांनी टीम इंडियाला आपल्या घरी जेवायला बोलावलेले. हेडिंग्ले टेस्टच्या रणनीतीबाबतही बॉयकॉट यांनी भारतीय संघाशी संवाद साधला, पण टॉस जिंकल्यानंतर सौरव गांगुलीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहून त्यांनी डोके धरले. हेडिंग्लेमध्ये इतके ढग होते की मॅच कृत्रिम प्रकाशाखाली सुरू होईल असे वाटत होते. थंडीत असे वातावरण इंग्लंडच्या बॉलर्सना नेहमीच आवडते. अशा स्थितीत त्यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करणे हा आत्मघातकी निर्णय होता.
सर्वजण याला मोठी चूक म्हणत होते, पण या निर्णयामागील कारण फार कमी लोकांना माहीत आहे. वास्तविक हा एक जुगार होता जो भारतीय थिंक टँकने खेळला होता. या निर्णयामागे सर्वात मोठा हात होता राहुल द्रविडचा. द्रविडला वाटत होते की, आपण आपल्या स्पिनर्सचा योग्य वापर करून घेत नाही. जर कदाचित मॅच पाचव्या दिवशी गेली तर, तिथे आपले स्पिनर्स इंग्लंडला 200 रन्सही करू देणार नाहीत. द्रविडने बांधलेला आडाखा गांगुलीला पटलेला आणि तो तयार झाला.
या मॅचसाठी आधीतर टीम कॉम्बिनेशन बदललं. पेसर आशिष नेहरा आणि ओपनर वसीम जाफर यांना बाहेर करून स्पिनर हरभजन सिंग व ऑलराऊंडर संजय बांगर यांना इलेव्हनमध्ये सामील करून घेतलं. बांगर ओपनिंगशिवाय थोडीफार मिडीयम पेस बॉलिंगही करू शकत होता.
मॅच सुरू झाली आणि दोन मॅच गाजवलेला सेहवाग लटकला. “गई भैंस पाणी मे” म्हणत सर्वांनी डोक्याला हात लावला. मात्र, बांगर आणि राहुल द्रविडने आणखी नुकसान न होऊ देता तो पूर्ण सेशन खेळून काढला. लंचसाठी जेव्हा बांगर आणि द्रविड आतमध्ये गेले तेव्हा कोच जॉन राईट यांनी द्रविडला पिन मारली. ते म्हणाले,
“राहुल तू आज इथं शतक मारतोय तर ते तुझ्या करिअरमधील बेस्ट शतक असेल बरं!”
हेच शब्द कानात घेऊन द्रविड ग्राऊंडवर उतरला. दुसरा सेशन पूर्णपणे विकेटलेस गेला. दोघांनी फिफ्टी मारली. दुसऱ्या विकेटसाठी 170 रन्सची पार्टनरशिप बनली. तीदेखील तब्बल 68 ओव्हर खेळून काढत. बांगर अति महत्त्वाचे 68 रन्स करून आऊट झाला.
दिवसातील शेवटच्या 15 ओव्हर्स द्रविड-सचिनने खेळून काढल्या. राईट यांचा शब्द द्रविडने पडू दिला नाही आणि शतक ठोकले. पहिल्या दिवशी टीम इंडिया 2 विकेट 236. दिवस सुरू होण्याआधी याची कोणी कल्पनाही केली नव्हती. दुसऱ्या दिवसाची सुरुवातही फारशी वेगळी झाली नाही. सचिन-द्रविडने पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडला अजिबात चान्स दिला नाही. ते 4 रन पर ओव्हरच्या रनरेटने रन्स करत होते. लंचनंतर मात्र द्रविड लाजवाब 148 रन्स करून माघारी परतला. त्यानंतर ग्राउंडवर आला कॅप्टन प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली. सचिन आणि गांगुली नॉटिंगहममध्ये नर्वस नाईन्टीजचे शिकार ठरलेले. त्यांनी ही इनिंग तिथूनच सुरू केली.
एश्ले जाइल्सला कडकडीत फोर मारत सचिनने शतकांच्या बाबतीत सर डॉन ब्रॅडमन यांना मागे सोडले. त्याच्यापुढे आता एकच व्यक्ती होती जी त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समधून कॉमेंट्री करत होती. नाव होते सुनील गावसकर.
दुसऱ्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये बॅड लाईट सुरु झाली. अंपायर्सने सचिन आणि गांगुलीला ऑफर दिली की, तुम्ही जाऊ शकता. त्यावर दोघांनी खेळायचे ठरवले. त्या चाळीस मिनिटात त्यांनी अक्षरशः इंग्लिश बॉलिंग फोडून काढली. वनडे स्टाईल धुमधडाका झाला. गांगुलीनेही आपले शतक पूर्ण केले. 128 वर गांगुली आऊट होताच दिवसाचा खेळ संपवण्यात आला. टीम इंडियाचा स्कोअर 4 विकेट्स 584. तिसऱ्या दिवशी सर्वांना प्रतीक्षा होती 185 रन्सवर नॉट आऊट खेळत असलेल्या सचिनच्या डबल सेंचुरीची. मात्र असं झालं नाही. आणखी आठ रनांची भर घालून तो आऊट झाला. साऱ्या स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता. एक ‘ग्रँड इनिंग’ खेळत सचिन माघारी निघालेला. त्यानंतर बाकी बॅटर्स तितकसं योगदान देऊ शकले नाहीत आणि 628 वर इनिंग डिक्लेअर केली गेली.
भारतीय क्रिकेट इतिहासात ज्यांना त्रिमूर्ती म्हणून ओळखलं गेलं. ज्यांनी तब्बल 12 वर्ष टीम इंडियाच्या बॅटिंगची, आणि तमाम भारतीयांच्या अपेक्षांची जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहिली त्या सचिन, द्रविड आणि गांगुलीने पहिल्यांदाच एका इनिंगमध्ये एकत्रित शतक ठोकलेलं. ते देखील पहिल्या आणि शेवटच्या वेळी.
बॅटर्सने उभारलेल्या एव्हरेस्टवर बॉलर्सने कळस चढवला. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला 273 वर ऑल आऊट केलं गेलं. इंग्लंडवर चक्क आपल्याच देशातून फॉलोऑन खेळण्याची नामुष्की आली. कॅप्टन नासिर हुसेनने दुसऱ्या इनिंगमध्ये शतक ठोकून प्रतिकारचा प्रयत्न केला. मात्र, बाकी कोण पन्नाशीही गाठू शकल नाही. टीम इंडिया मॅच जिंकलेली. ती देखील इनिंग आणि 46 रन्सने. पहिली बॅटिंग करण्याचा जुगार खेळायला लावणारा आणि स्वतःच त्या निर्णयाला योग्य ठरवणाऱ्या द्रविडला मॅन ऑफ द मॅच दिली गेली. पुढची ओव्हल टेस्ट ड्रॉ राहिली आणि सीरिज बरोबरीत सुटली. मात्र, जो योगायोग हेडिंग्लेच्या लीड्सवर पाहण्यात आला तो त्रिवेणी शतकाचा सोहळा पुन्हा कधी झालाच नाही!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संघ 1, आणि गोलंदाज 11: भारताची क्रिकेटविश्वातील सर्वात दुर्मिळ घटना, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचाच
दुर्दैवी! दुखापतींमुळे ‘या’ क्रिकेटपटूंच्या करिअरला कायमचा लागला ब्रेक, यादीत एका भारतीयाचाही समावेश