आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी२० अश्या ३ स्वरूपातील क्रिकेट खेळले जाते. कसोटी आणि वनडे क्रिकेटची सुरुवात फार पुर्वीपासून झाली. मात्र, टी२० क्रिकेटचा आरंभ गेल्या काही वर्षात झाला आहे.
२००६मध्ये भारताने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. हा सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झाला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे, २००६-२०२० या काळात भारताने एकूण १३४ टी२० सामने खेळले. त्यापैकी ८३ सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. त्यातही श्रीलंकाविरुद्ध भारताने सर्वाधिक १३ वेळा टी२० सामने जिंकले आहेत.
२० षटकांच्या या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्वरूपात असे बरेच रोमांचक सामने झाले आहेत, ज्यामध्ये शेवटच्या चेंडूवर संघाचा जय पराजय ठरला आहे.
या लेखात अशा काही रोमांचक आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या आढावा घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. 6 times india won t20i on last ball.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरा टी२०, सिडनी ३१ जानेवारी २०१६) –
जानेवारी २०१६मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. यावेळी दोन्ही संघात ३ सामन्यांची टी२० मालिका झाली होती. ३१ जानेवारी २०१६ला सिडनीमध्ये टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पार पडला होता. भारत या सामन्यात २-०ने आघाडीवर होता.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत, ५ बाद १९७ धावा केल्या होत्या. यात शेन वॉटसनच्या नाबाद १२४ धावांचे योगदान होते. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, विराट कोहली (५०) आणि रोहित शर्मा (५२) यांनी अर्धशतकी खेळी केल्या होत्या.
सामन्याच्या शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. अशात युवराज सिंगने षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर १ धाव घेत पुढे सुरेश रैना फलंदाजीस आला. रैनाने चौथ्या आणि ५व्या चेंडूवर प्रत्येकी २ धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर भारताला ४ धावांची गरज असताना रैनाने शानदार षटकार मारत, ती ऐतिहासिक मालिका जिंकली.
भारत विरुद्ध बांग्लादेश (गटातील सामना, बेंगलोर २३ मार्च २०१६) –
२०१६साली बेंगलोरमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध बांग्लादेश संघात खूप महत्त्वाचा सामना झाला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करत भारताने २० षटकात ७ बाद १४६ धावा केल्या होत्या. भारतीय संघातील एकाही फलंदाजाला त्यावेळी मोठी खेळी करता आली नव्हती.
भारताने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशने १८व्या षटकापर्यंत ६ विकेट्स गमावल्या होत्या. शेवटच्या षटकात त्यांना ११ धावांची आवश्यकता होती. यावेळी महमुदूल्लाहने षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. पुढे फलंदाजीस आलेल्या मुशफिकर रहिमने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर २ चौकार मारले.
मात्र, हार्दिक पंड्याने चौथ्या आणि ५व्या चेंडूवर अनुक्रमे रहिम आणि महमुदूल्लाहला बाद केले. शेवटच्या चेंडूवर बांग्लादेशला विजयासाठी २ धावांची गरज होती. पण पंड्याच्या गोलंदाजीवर एमएस धोनीने फलंदाजीस आलेल्या मुस्तफिजुर रेहमानला धावबाद केले आणि एका धावेने भारताने तो सामना जिंकला.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे (तिसरा टी२०, हरारे २२ जून २०१६) –
२२ जून २०१६ला झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना झाला होता. दोन्ही संघ मालिकेत १-१ने बरोबरीवर होते. झिम्बाब्वेने प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने ६ बाद १३८ धावा केल्यया होत्या. यात केदार जाधवच्या अर्धशतकी (५८) खेळीचे योगदान होते.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात २१ धावांची आवश्यकता होती. यावेळी बरिंदर श्रानच्या पहिल्या चेंडूवर झिम्बाब्वेचा फलंदाज मारुमाने चौकार मारला. त्यानंतरचा चेंडू वाइड ठरला आणि पुढील नो बॉलवर परत त्याने चौकार मारला. पुढील २ चेंडूत श्रानने एकही धाव दिली नाही. पण चौथ्या चेंडूवर मारुमाने एक धाव घेतली.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या चिंगबुराने ५व्या चेंडूवर चौकार मारला. मात्र, शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला आणि भारताने ३ धावांनी ती मालिका खिशात घातली.
भारत विरुद्ध इंग्लंड (दुसरा टी२०, नागपूर २९ जानेवारी २०१७) –
जानेवारी २०१७मध्ये इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी त्यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका झाली होती. २९ जानेवारी २०१७ला नागपूर येथे मालिकेतील दुसरा सामना झाला होता. त्यापुर्वी इंग्लंड १-०ने आघाडीवर होता.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १४४ धावा केल्या होत्या. यात केएल राहूलच्या ७१ धावांचा समावेश होता. भारताने दिलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडच्या जो रूट आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी ३८ धावांचे योगदान दिले होते.
शेवटच्या षटकात इंग्लंडला ८ धावा करायच्या होत्या. जसप्रीत बुमराहने त्यावेळी गोलंदाजी करताना पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे रूट आणि बटलरला बाद केले होते. शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. पण, बुमराहने शेवटच्या चेंडूवर धाव न देता संघाला विजय मिळवून दिला होता.
भारत विरुद्ध बांग्लादेश (निदाहास ट्रॉफी अंतिम सामना, कोलंबो १८ मार्च २०१८) –
२०१८ साली श्रीलंकामध्ये निदाहास ट्रॉफीतील अंतिम सामना झाला होता. भारत विरुद्ध बांग्लादेश संघातील हा शेवटचा टी२० सामना कोलंबोमध्ये झाला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने २० षटकात ८ बाद १६६ धावा केल्या होत्या.
भारताकडून सलामीला फलंदाजी करताना रोहित शर्माने ५६ धावा केल्या होत्या. त्याच्या या योगदानामुळे भारत शेवटच्या षटकापर्यंत मजबूत स्थितीत होता. तरीही भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी १२ करायच्या होत्या.
शेवटच्या षटकातील पहिला चेंडू वाइड होता. पुढे परत पहिल्या चेंडूवर फलंदाजी करणाऱ्या सौम्य सरकारला धाव घेता आली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर १-१ धाव घेतली. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विजय शंकरने चौथ्या चेंडूवर चौकार मारला. मात्र, पाचवा चेंडू लाँग ऑफ गेल्याने तो बाद झाला. पण फलंदाजीस उतरलेल्या दिनेश कार्तिकने शानदार षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला होता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (तिसरा टी२०, चेन्नई ११ नोव्हेंबर २०१८) –
११ नोव्हेंबर २०१८ला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना झाला होता. यावेळी वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनच्या अर्धशतकीय खेळीच्या मदतीने त्याच्या संघाने ३ बाद १८१ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजने दिलेल्या या १८२ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, शिखर धवनने ९२ आणि रिषभ पंतने ५८ धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी फक्त ५ धावा करायच्या होत्या. यावेळी धवनने फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर २ आणि दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली होती.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मनिष पांडेने तिसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली. चौथा चेंडूवर एकही धाव नाही मिळाली आणि ५व्या चेंडूवर धवन बाद झाला. अखेर शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत पांडेने भारताला विजय मिळवून दिला.
ट्रेंडिंग घडामोडी-
आयपीएल इतिहासात प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू
खराब खेळपट्टीमुळे रद्द केलेले ३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, २ आहेत…
पाकिस्तानच्या खेळाडूला टीम इंडियाचं कोच बनून करायचं आहे हे काम