वरच्या फळीतील फलंदाज वनडेमध्ये वर्चस्व गाजवत असल्याने मधल्या फळीतील फलंदाजांना आपला खेळ दाखवण्याची तितकीशी संधी मिळत नाही. त्याहूनही कमी संधी हे खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या म्हणजेच सहाव्या, सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना मिळते. या फलंदाजांना सामना संपवण्याची जबाबदारी दिलेली असते. त्यापैकी एक फलंदाज आणि या प्रकारात जगातील सर्वोत्तम फिनिशर मानाला जातो तो म्हणजे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी.
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस, भारतीय संघाची फलंदाजी अत्यंत मजबूत होती. ते दर्शविण्यासाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, युवराज सिंग आणि मोहम्मद कैफही नावे पुरेशी आहेत. २००० च्या दशकाच्या मध्यावर भारतीय संघ संक्रमण काळात आला. अनुभवी खेळाडू युवा खेळाडूंना जास्त संधी देऊ लागले. नेमके, याच सुमारास धोनीने भारतीय संघात पाऊल ठेवले.
सुरवातीचे काही सामने अपयशी ठरल्यानंतर धोनीने आपल्या बॅटने भल्याभल्यांना पाणी पाजायला सुरुवात केली. आजवर क्रिकेटच्या कसोटी, वन डे आणि टी२० मध्ये मिळून तब्बल ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळून त्यामध्ये अनेक विजय एकट्याच्या बळावर मिळवून दिले आहेत. आयसीसीच्या सर्व ट्रॉफीज जिंकणारा कर्णधार आणि सोबतच क्रिकेटच्या तिनही प्रकारात तो जगाच्या इतिहासातील बेस्ट फिनिशर झाला आहे. २००४ च्या शेवटी शेवटी सुरू झालेला हा प्रवास १६ वर्षे चालला.
आजतागायत वन-डेमध्ये धोनीच्या नावे ३५० सामन्यांमधून ५०.५३ च्या सरासरीने १०,७७३ धावा आहेत. आज आपण त्याच्या, वनडेमधील धावांचा पाठलाग करताना खेळलेल्या ५ सर्वोत्तम खेळ्यांविषयी जाणून घेऊया.
५) ४५* (५२) विरुद्ध श्रीलंका, पोर्ट ऑफ स्पेन, २०१३
स्ट्राईक रेट: ८६.५३, चौकार: ५, षटकार: २
भारत, श्रीलंका आणि वेस्टइंडीज यांदरम्यानच्या तिरंगी मालिकेचा अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर रंगला होता. गोलंदाजांना अनुकूल अश्या खेळपट्टीवर श्रीलंकेने फक्त २०१ धावा बनवल्या. प्रत्युत्तरादाखल भारत रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर ढेपाळला. सर्व प्रमुख फलंदाज बाद होत गेले पण कर्णधार धोनीने एक बाजू लावून धरली होती.
अखेरचे षटक श्रीलंकेचा शमिदा एरंगा टाकणार होता. विजयासाठी भारताला एका षटकात १५ धावांची तर श्रीलंकेला एका विकेटची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतरही आपल्या थंड डोक्याचे प्रदर्शन करत पुढील चेंडूंवर षटकार, चौकार आणि पुन्हा षटकार ठोकत धोनीने भारताला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
४) ७७ * (५६) विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, २००६
स्ट्राईक रेट: १३७.५, चौकार: ६, षटकार: ४
भारताने आधीच मालिका खिशात घातली होती, परंतु प्रतिस्पर्धी पाकिस्तान म्हटल्यावर प्रत्येक विजय आणि पराभव महत्त्वाचा असतो. २८७ धावांच्या भक्कम लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्या सकारात्मक सलामीसह चांगली सुरुवात केली. ही जोडी बाद झाल्यावर, युवी-धोनीची जोडी सामना संपूनच परतली. युवराजची सर्वांगसुंदर खेळी शतकात बदलली.
धोनीने अवघ्या ५६ चेंडूंत ७७ धावा फटकावल्या. या खेळीत सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. भारताने १९ चेंडू राखून विजय मिळवला. धोनीने याच मैदानावर एका आठवड्यात पाकिस्तानची दुसऱ्यांदा शिकार केली होती.
३) ९१* (७९) विरुद्ध श्रीलंका, मुंबई, २०११
स्ट्राईक रेट: ११५.१, चौकार: ८, षटकार: २
“Dhoni,Finishes off in Style”. हे शब्द प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि कानात अजूनही उमटत आहेत. एमएस धोनीने विश्वचषकाच्या अंतिम लढतीत केलेल्या खास खेळीचे प्रत्येक व्यक्तीच्या मनात विशेष स्थान आहे. विश्वचषकातील अंतिम सामन्यात तीन गडी बाद झाल्यानंतर युवराजसिंगने क्रीजवर येणे अपेक्षित होते. परंतु, अनेकांना आश्चर्य वाटले की, पूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेला धोनी मैदानावर उतरत होता.
गौतम गंभीरला साथ करत, मिळेल त्या खराब चेंडूवर चौकार वसूल करत त्याने धावफलक हलता ठेवला. गंभीर शेवटपर्यंत टिकू शकला नाही आणि वैयक्तिक ९७ धावांवर बाद झाला. त्यानंतर युवराजसोबत मॅच विनिंग भागीदारी करत त्याने विजय भारतीय संघाच्या दृष्टिक्षेपात आणला. कुलशेखराला उत्तुंग षटकार ठोकत त्याने २८ वर्षानंतर भारताला विश्वविजेते बनवले. वन डे क्रिकेटच्या इतिहासातील एक महान खेळी म्हणून ही खेळी गणली जाते.
२) ७२* (४६) विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, २००६
स्ट्राईक रेट: १५६.५, चौकार: १३, षटकार: ०
धोनीने तिसर्या क्रमांकावर छाप टाकली होता तरी, वरच्या क्रमांकावर घेऊन देखील तो सामना संपवत होता आणि संघाला त्याच्याबद्दल विश्वास वाढला. संघ व्यवस्थापन धोनीमधील संभाव्य फिनिशर पाहत होते. धोनी आपला पहिलाच पाकिस्तान दौरा करत होता. तिसऱ्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानने २८९ धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले.
भारताने धावांचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि १२ धावांत दोन गडी गमावले सुद्धा. या प्रतिकूल परिस्थितीतून सचिन तेंडुलकर व युवराज सिंग यांनी उपयुक्त भागीदारी रचत भारताला बाहेर काढले. पण, सचिन वैयक्तिक ९५ धावांवर बाद झाला तेव्हा, शेवटच्या ९० चेंडूंत १०० धावांची गरज होती. सचिन पाठोपाठ कैफदेखील तंबूत परतला. भारत पुन्हा अडचणीत.
धोनी मैदानात उतरल्यावर काय होणार आहे, याची कल्पना देखील कोणाला नव्हती. पहिल्या चेंडूपासूनच त्याने आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या इच्छेनुसार चौकार ठोकत धोनीला अर्धशतक झळकायला अवघे ३५ चेंडू लागले. त्यानंतरही, त्याने ११ चेंडूंत २२ धावा जोडल्या आणि भारताला आरामात विजयी केले.
१) १८३* (१४५) वि श्रीलंका, जयपूर, २००५
स्ट्राईक रेट: १२६.२, चौकार: १५, षटकार: १०
वर्ष २००५ होते आणि त्यावेळी धोनी अजूनही भारतीय संघात स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आपल्या खेळाची झलक दाखवली होती पण, संघात जागा कायम करण्यासाठी त्याला काहीतरी खास करावे लागणार होते आणि तेव्हाच त्यानं आपल्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली.
३०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सचिन-सेहवाग ही जोडी मैदानात उतरली. सचिन स्वस्तात बाद झाला आणि तिसर्या क्रमांकावर बढती मिळाल्याने धोनीने मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीपासून धोनीने फटकेबाजीला सुरुवात केली. मधल्या काळात सेहवाग बाद झाला परंतु धोनीने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला.
धोनीनेने ८५ चेंडूत शतक पूर्ण केले आणि त्याच्या खेळीच्या अखेरीस १५ चौकार आणि १० गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. चार षटके राखून, लांब केस असलेल्या धोनीने भारताला आरामात विजयी रेषा ओलांडून दिली होती. आजपर्यंत १८३* ही वनडे क्रिकेटमधील धोनीची सर्वाधिक धावसंख्या आहे आणि खेळाच्या चाहत्यांसाठी लूपवर टाकून वारंवार पाहण्यासारखी एकमेवाद्वितीय खेळी.