मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे एकूण 21 खेळाडू भाग घेणार आहेत. इंग्लंडमध्ये सुरु असलेली द्विपक्षीय वनडे मालिका संपल्यानंतर या दोन्ही देशाचे खेळाडू थेट संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे दाखल होतील. तथापि, युएईला पोहोचल्यावर या खेळाडूंना क्वांरटाइनपासून सूट मिळणार नाही आणि त्यांना क्वारंटाइनमध्ये राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे या खेळाडूंना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते.
या खेळाडूंना क्वारंटाइनमध्ये सूट न दिल्यास आयपीएलच्या सात संघांवर परिणाम होईल. केवळ गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण त्यांचा कोणताही खेळाडू इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळत नाही.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी -20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे, तर तीन वनडे सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे आणि या मालिकेचा निर्णायक सामना बुधवारी खेळला जाईल.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू मालिका संपल्यानंतर 17 सप्टेंबर रोजी आयपीएलसाठी युएईमध्ये दाखल होतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) चे अध्यक्ष संजीव चुडीवाला यांच्यासह काही फ्रँचायझी अधिकार्यांनी युक्तिवाद केला की, दोन्ही संघातील खेळाडू या वनडे मालिकेत प्रेक्षकविना जैवसुरक्षित वातावरणात खेळत आहेत आणि त्यांना चार्टर्ड विमानाने थेट युएईला आणले जाईल, म्हणूनच त्यांना अलग ठेवण्याच्या नियमात सूट दिली जाऊ शकते. पण आयपीएलसाठीचा कार्यक्रम या प्रोटोकॉल आणि इतर आरोग्यविषयक उपाय लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे, म्हणून इंग्लंडहून युएईमध्ये येणार्या सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल.
आयपीएलच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) नुसार खेळाडूंच्या पहिल्या, तिसर्या आणि सहाव्या दिवशी कोविड -१९ ची टेस्ट होईल, तिन्ही टेस्टचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच हे खेळाडू संघात सामील होऊ शकतील. या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर 24 सप्टेंबरपासून हे खेळाडू खेळू शकतील आणि तोपर्यंत सर्व संघांनी किमान एक सामना खेळला असेल तर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्जचे दोन सामने होणार आहेत.