इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला. भारतीय संघाच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच होणार्या टी२० वर्ल्डकपपूर्वी भारताची ही शेवटची मालिका होती. त्यामुळे वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी भारतीय संघाने या मालिकेत अनेक प्रयोग केले.
यातील काही सामन्यात अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली, तर नवोदित खेळाडूंना संधी देत त्यांची गुणवत्ता चाचपून पाहिली. शेवटच्या सामन्यात तर चक्क धाडसी निर्णय घेत कर्णधार विराट कोहली रोहित शर्माच्या साथीने सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरला. मात्र हा निर्णय अतिशय अचूक असल्याचे या दोघांनी केलेल्या मोठ्या खेळींद्वारे सिद्ध झाले. मात्र कोहलीच्या या सलामीला येण्याच्या निर्णयाने आता भारतीय संघातील तीन खेळाडूंच्या वर्ल्डकप खेळण्याच्या स्वप्नांना धक्का लागू शकतो.
१) ईशान किशन –
झारखंडच्या या युवा यष्टीरक्षक-फलंदाजाने इंग्लंडविरुद्धच्याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात सलामीला येत अर्धशतकी खेळी करत त्याने सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला. मात्र त्यानंतरच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करतांना दुखापत झाल्याने उर्वरित दोन सामन्यांना त्याला मुकावे लागले.
त्याच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादवने दोन्ही सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. तसेच सलामीला येऊन रोहित शर्मासह मोठी भागीदारी करणार्या विराट कोहलीने भविष्यात देखील सलामीला फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा परिस्थितीत ईशान किशनला अंतिम अकराच्या संघात संधी मिळणे, कठीण दिसते आहे.
२) शिखर धवन –
भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनला या संपूर्ण मालिकेत केवळ एका सामन्यात संधी मिळाली. या सामन्यात धवन ४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर त्याला एकाही सामन्यात संधी दिल्या गेली नाही. आता रोहित शर्मासह कोहलीच जर सलामीला फलंदाजी करणार असेल तर येत्या टी२० वर्ल्डकपमध्ये भारताकडून खेळण्याचे शिखर धवनचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे.
३) पृथ्वी शॉ –
मुंबईचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शाॅ गेले काही महिने सातत्याने चर्चेत आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौर्यावरील खराब कामगिरीमुळे तो टीकेचा धनी झाला होता. मात्र त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतत आपल्या खेळातील चुका सुधारून त्याने दमदार प्रदर्शन केले. यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीतील त्याच्या प्रदर्शनाने त्याने अनेकांची वाहवा मिळवली. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळेल, असा अनेकांचा होरा होता. मात्र आता विराट कोहली सलामीला फलंदाजी करणार असेल तर त्याला संघात स्थान मिळणे, जवळपास अशक्य आहे.
महत्वाच्या बातम्या:
भुवीच्या चेंडूवर जेसन रॉय बोल्ड, रागाच्या भरात केलं असं काही; व्हिडिओ पाहून म्हणालं लज्जास्पद!
रोहित-विराट वादाच्या चर्चेला पूर्णविराम! पाचव्या सामन्यात दिसले जबरदस्त बॉन्डिंग
व्हिडिओ : रोहितची नेत्रदीपक फटकेबाजी! पाहा अर्धशतकी खेळीतील लाजवाब षटकार