वयोमर्यादा ही प्रत्येक खेळात मोठी बाब असते. वयाचे बंधन हे केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच नाही तर कसोटी क्रिकेटमध्येही आड येत असते. वयोमानानुसार खेळणे कठीण होत जाते. वय जास्त झालेल्या खेळाडूंसाठी कसोटी क्रिकेट कधी कधी जास्त मारक ठरले आहे. कोणत्याही महान क्रिकेटपटूची मोठी खेळी आपल्या मनात वर्षानुवर्षे ताजी राहते. परंतु, कालांतराने त्यांची कामगिरी घसरायला लागते. अनेक दिग्गज खेळाडूंना वाढत्या वयानंतर समस्या आल्या आहेत. चला अशाच काही क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूया जे त्यांच्या शिखरावर खूप चांगले खेळत होते, परंतु कालांतराने त्यांची कामगिरी घसरली.
३. वसीम अक्रम
वसीम अक्रमला कोण विसरू शकेल. त्याच्या स्विंग गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांचा घाम निघत असे. महान पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने १९८५ मध्ये ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर पदार्पण केले होते आणि १९९९ पर्यंत ९१ कसोटी सामन्यांमध्ये ३८३ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये त्याने २२ वेळा सामन्यात ५ बळी घेतले होते. पण कालांतराने त्याच्या गोलंदाजीची धार कमी होत गेली आणि गेल्या १३ कसोटी सामन्यांमध्ये त्याला केवळ ३१ विकेट घेता आल्या होत्या. वसीम अक्रमने २००२ मध्ये कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेतली. परंतु, २००३ च्या विश्वचषकापर्यंत एकदिवसीय सामने खेळत राहिला.
२. रिकी पाँटिंग
सन २००० च्या मध्यापर्यंत, रिकी पाँटिंग जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. तो आपल्या अद्भुत फटकेबाजीने मोठमोठ्या गोलंदाजांचा घाम फोडत असे. ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषवताना त्याने भरपूर धावा करून ऑस्ट्रेलिया संघाला नव्या उंचीवर नेले होते, पण काळाच्या ओघात त्याची फलंदाजी खराब होत गेली. १० डिसेंबर २०१० पासून डिसेंबर २०१२ मध्ये त्याच्या निवृत्तीपर्यंत पाँटिंग १८ कसोटी सामन्यांमध्ये ३४.१२ च्या सरासरीने फक्त १०५८ धावा करू शकला होता. त्याआधी त्याने १५० सामन्यांमध्ये ५४.२७ च्या प्रभावी सरासरीने ३९ शतके झळकावून १२,००० हून अधिक धावा केल्या होत्या. परंतु दुर्दैवाने त्याचा पुल शॉट, जो त्याची सर्वात मजबूत बाजू होती, तीच त्याची कमजोरी ठरली. त्याच्यासोबत खेळणारा दिग्गज खेळाडू मायकेल क्लार्कने याबाबत खुलासा केला होता. जर पॉन्टिंगने निवृत्ती घेतली नसती तर, ऑस्ट्रेलियन निवडकर्ते त्याला संघातून वगळू शकले असते.
१. सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर हे नाव जगातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहीत आहे. सचिनने १९८९ मध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. वानखेडे स्टेडियमवर सचिनने शेवटचा कसोटी सामना खेळला तेव्हा त्याच्या निरोपाच्या वेळी सर्वांच्या डोळ्यात ओलावा होता. सहकाऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू होते. जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या निवृत्तीने सर्वांनाच दु:ख झाले होते.
मात्र, निवृत्ती घेण्याच्या काही वर्ष आधी सचिनची कामगिरी तशी काही खास राहिली नाही, हे पाहून सचिनच्या निवृत्तीची वेळ जवळ आल्याचे जाणवत होते. २०१०-११ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात त्याने डेल स्टेनचा चांगला सामना केला होता. परंतु सचिनने त्याच्या शेवटच्या २३ कसोटी सामन्यांमध्ये ३२.३४ च्या सरासरीने केवळ १२२९ धावा केल्या होत्या. जगातील सर्वाधिक शतकांचा विक्रम करणाऱ्या या फलंदाजाने या काळात एकही शतक झळकावले नव्हते.
जर, २०११ च्या विश्वचषकानंतर सचिन निवृत्त झाला असता, तर त्याने १७७ सामन्यांत ५६.९४ च्या सरासरीने १४,६९२ धावा करून आपली कारकीर्द संपवली असती. सचिनच्या निवृत्तीनंतर भारतीय चाहते क्रिकेट पाहणे बंद करतील, असे म्हटले जात होते, पण यानंतर विराट कोहलीचा उदय झाला. सचिनला आपला आदर्श मानून कोहलीने त्याची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! फिफा विश्वचषकाच्या 44 वर्षात पहिल्यांदाच ‘अशी’ अप्रिय घटना, सर्वोत्तम खेळाडू बाहेर
जशास तसे! असे 3 प्रसंग, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाच्या स्लेजिंगला दिलंय खणखणीत प्रत्युत्तर