आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत संयुक्त अरब अमिराती आणि ओमान देशात होणार आहे.
या विश्वचषकासाठी भारतीय संघात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही १५ जणांच्या संघात स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ मात्र संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरले. वेगवान गोलंदाजांमध्ये अनुभवी भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ निवडीबद्दल पाच मोठ्या गोष्टी जाणून घेऊया.
१ सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना डच्चू
सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना टी -२० विश्वचषक भारतीय संघात संधी मिळालेली नाही. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात या दोघांनी दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही दोघांनी खूप धावा केल्या होत्या. पण निवड समितीने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही. केएल राहुलला धवनपेक्षा प्राधान्य देण्यात आले आहे. तो रोहित शर्मासोबत सलामीवीराच्या भूमिकेत दिसू शकतो.
२. सूर्यकुमार यादव आणि इशानची एन्ट्री
सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा टी -२० संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवला सातत्यपूर्ण कामगिरीची भेट मिळाली आहे. सूर्यकुमार यादवने यावर्षी एकदिवसीय आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने निवड समितीला त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. श्रीलंका दौऱ्यातही सूर्यकुमार यादवने शानदार कामगिरी केली. त्याचबरोबर निवड समितीने इशान किशनवरही विश्वास दाखवला आहे. इशान किशनने टी -२०मध्ये आपल्या पदार्पणातील डावात अर्धशतक ठोकले.
३. रविचंद्रन अश्विनची धक्कादायक निवड
टी -२० विश्वचषकासाठी रविचंद्रन अश्विनची निवड सर्वात धक्कादायक होती. या दिग्गज ऑफस्पिनरने चार वर्षांपासून भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. त्याने ९ जुलै २०१७ रोजी भारतीय संघासाठी शेवटचा टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ३४ वर्षीय अश्विनने किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हा सामना खेळला होता.
लेगस्पिनर युझवेंद्र चहलचीही टी -२० विश्वचषक संघात निवड झालेली नाही. तो बराच काळ भारतीय संघासाठी टी -२० सामन्यांमध्ये खेळत होता. कुलदीप यादवलाही संघात स्थान मिळाले नाही.
४. अक्षर पटेलची सरप्राईज एन्ट्री
अक्षर पटेलची टी -२० विश्वचषकातील एन्ट्री सर्वांसाठीच आश्चर्यचकित करणारी होती. त्याला रवींद्र जडेजासह बॅकअप अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली होती. यूएईमधील खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करू शकते. म्हणूनच अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, अक्षर पटेल फलंदाजीतही योगदान देऊ शकतो, त्यामुळे तो भारतीय संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.
५. अनुभवी वेगवान गोलंदाजांवर दाखवला विश्वास
निवड समितीने टी -२० विश्वचषकातील अनुभवी वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवला आहे. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा १५ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांना संघात राखीव खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. यावरून हे स्पष्ट होते की निवडकर्त्यांनी भारताच्या अनुभवी वेगवान त्रिकुटावर विश्वास दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खूशखबर! ‘हा’ खेळाडू दुखापतीतून सावरला
गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर






