आगामी टी२० विश्वचषक ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघात रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली आहे.
अश्विन मागच्या चार वर्षांपासून भारताच्या टी२० संघातून बाहेर होता. त्यानंतर चार वर्षांनी त्याला भारताच्या टी २० संघात संधी दिली गेली आहे, त्यातही थेट विश्वचषकाठी. भारतीय संघात त्याच्याव्यतिरिक्त फिरकी गोलंदाजाच्या रूपात रवींद्र जडेजा, राहुल चाहर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनाही संघात सामील केले गेले आहे.
अश्विनने त्याचा भारतीय संघासोबतचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना जुलै २०१७ मध्ये खेळला होता. हा सामना अश्विनने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला असून हा सामना किंग्सटन येथे खेळला गेला होता.
अश्विनने ४६ आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामन्यात ५२ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात ८ धावा देऊन ४ विकेट्स मिळवल्या होत्या आणि हे त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. तो भारताचा टी२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू होता.
टी२० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार असून तेथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फायदा होत असतो. याच पार्श्वभूमीवर अश्विनला संघामध्ये सामील केले गेले आहे. असे असले तरी मात्र, भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेद्र चहललाही टी २० विश्वचषकासाठी संधी मिळाली नाही. त्याव्यतिरिक्त कृणाल पंड्यालाही संघात स्थान मिळवता आले नाही.
१ जानेवारी २०१८ पासून चहलने ३५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ३६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सध्या तो भारताचा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत ४९ सामन्यांत ६३ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे अजून कोणत्याही भारतीय गोलंदाजाला ६० पेक्षा अधिक विकेट्स आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये घेता आलेल्या नाहीत. चहलची कामगिरी चांगली असतानाही त्याला वगळले गेल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
यावर्षीचा टी२० विश्वचषक भारतात खेळला जाणार होता, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे. यावर्षीच्या टी २० विश्वचषकात १६ संघ सामील होणार आहेत. भारतयी संघ स्पर्धेत ग्रुप २ चा भाग आहे. या ग्रुपमध्ये अफगानिस्तान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. भारतीय संघ विश्वचषकातील त्याचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर
…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला