भारताला १९ विश्वचषकाने अनेक स्टार फलंदाज दिले. विराट कोहली, रविंद्र जडेजा, मनिष पांडे, पृथ्वी शाॅ, युवराज सिंग किंवा मोहम्मद कैफ अशी त्यातली काही नावे. अनेक युवा खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ म्हणून याचा वापर करता आला.
परंतु, काही असेही क्रिकेटर ठरले ज्यांच्याकडे जबरदस्त प्रतिभा असूनही त्यांना भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. हे असे काही क्रिकेटर आहेत ज्यांची चर्चा विश्वचषक संपल्यावर काही महिन्यांनी थांबली. पुढे त्यांना देशांतर्गंत क्रिकेटमध्ये राज्याकडून खेळणेही अवघड होऊन बसले.
या लेखात प्रतिभा असूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंबद्दल आपण बोलणार आहोत. हे असे खेळाडू आहेत जे आजही टीम इंडियाकडून संधी मिळण्याची वाट पाहत आहेत. 5 former India U-19 cricketers who are yet to make it big in the domestic circuit.
५. अशोक मनेरिया
२००८साली भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर २०१०मध्ये अशोक मनेरिया या खेळाडूने १९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले. भारतीय संघाने या विश्वचषकात विशेष काही केले नसले तरी अशोक मनेरियाकडे भविष्यातील एक मोठा खेळाडू म्हणून क्रिकेटप्रेमी पाहत होते. परंतु त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही.
या विश्वचषकात मनेरियाने ६ सामन्यात खेळताना ५ डावात गोलंदाजी करताना २०.५०च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या. विश्वचषक खेळण्यापुर्वीच प्रथम श्रेणी व अ दर्जाच्या सामन्यात राजस्थानकडून पदार्पण केलेल्या मनेरियाने फलंदाजीत थोडीफार बरी कामगिरी केली आहे.
प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना त्याने ७९ सामन्यात ३८.९७च्या सरासरीने ४६७७ धावा व २० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या सामन्यात त्याने ९२ सामने खेळले असून त्यात २३१८ धावा व ३३ विकेट्स घेतल्या आहेत. ३० वर्ष वय असलेल्या मनेरियाला सातत्यपुर्ण कामगिरी न केल्यामुळे टीम इंडियात संधी मिळू शकली नाही. जडेजा व अश्विनसारखे अष्टपैलू खेळाडू संघात असल्याने मनेरियाला संघात जागा मिळणे जवळपास अशक्यच होतेे.
४. सर्फराज खान
साल २०१५मध्ये आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या सर्फराज खानने २०१४ व २०१६ अशा दोन १९ वर्षाखालील विश्वचषकात खेळण्याचा कारनामा केला. १२ सामन्यात ४ वेळा नाबाद राहत ७०.७५च्या सरासरीने तब्बल ५६६ धावा केल्या. १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑयन माॅर्गन व बाबर आझमनंतर आजही सर्फराजचे नाव तिसऱ्या स्थानी आहे.
२३ वर्षीय सर्फराजने मुंबई, उत्तरप्रदेश व मुंबई असा देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रवास २०१४ ते २०२० पर्यंत केला आहे. २०२० रणजी हंगामात त्याने नाबाद ३०१, नाबाद २२६, १७७ व ७८ धावांच्या शानदार खेळी केल्या आहेत. सर्फराजनंतर संघात आलेल्या पृथ्वी शाॅने भारतीय संघात आपली जागा पक्की केलेली आहे. सर्फराजही संघाची दारं आता ठोठावतं आहे. परंतु त्याला किती लवकर संधी मिळतेय हे पहाणं औत्सुक्याच ठरणार आहे.
३. इक्बाल अब्दुल्ला
अतिशय गरिब घरातून आलेला हा क्रिकेटर भारतीय संघाकडून १९ वर्षाखालील विश्वचषकात २००८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळला. याच विश्वचषकात भारताकडून खेळताना अब्दुल्लाने ६ सामन्यात १३च्या जबरदस्त सरासरीने १० फलंदाजांना तंबूत पाठवले. भारताने हा विश्वचषक जिंकण्यात अब्दुल्लाने मोठी कामगिरी केली होती. अब्दुला विश्वचषकानंतर सतत देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला परंतु त्याला टीम इंडियात मात्र प्रवेश करता आला नाही.
बंगाल व सिक्कीम या दोन राज्याकडून रणजी स्पर्धा खेळलेल्या अब्दुलाने काही वर्षांनी मुंबई संघातील स्थानही गमावले होते. त्यानंतर त्याने सिक्कीमचा रस्ता धरला. तो एकूण ६८ प्रथम श्रेणी सामने खेळला असून त्यात २८.३४च्या चांगल्या सरासरीने त्याने २१३ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीतही त्याने ३२.२८च्या सरासरीने २४८६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ९२ सामन्यात ११२० धावा व १२७ विकेट्स घेतल्या आहेत. ३१ वर्ष वय असलेल्या अब्दुलाने यावर्षी सिक्कीमकडून बरी कामगिरी केली आहे.
२. विजय झोल
साल २०१४मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकात विजय झोलने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. या विश्वचषकात झोलच्या नेतृत्त्वाखाली खेळलेले दिपक हुडा, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव व संजू सॅमसन यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली परंतु, झोलला मात्र आजपर्यंत एकही सामना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. विश्वचषकात एवढं नाव चर्चिल गेल्यानंतर झोलला २०१४मध्ये बेंलगोर संघाकडून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली परंतु जेमतेम ३ सामने त्याला खेळायला मिळाले. त्यातही त्याने दोन डावात १४.५च्या सरासरीने केवळ २९ धावा केल्या. पुढे त्याचे नाव मागे पडत गेले.
साल २०१३ ते २०१९ या काळात झोलने महाराष्ट्राकडून १५ प्रथम श्रेणी सामन्यात ३४.९०च्या सरासरीने ७३३ तर अ दर्जाच्या १९ सामन्यात २८.७३च्या सरासरीने ५४६ धावा केल्या आहेत. जो खेळाडू एकवेळ टीम इंडियाकडून खेळेल असे वाटत होते तो महाराष्ट्राच्या संघातही ७ वर्षात आत-बाहेर करत राहिला. झोल सध्या २५ वर्षांचा असून महाराष्ट्राच्या संघातही स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे.
१. उन्मुक्त चंद
२०१२ साली १९ वर्षाखालील विश्वचषकात उन्मुक्त चंद या दिल्लीकर खेळाडूने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. हा खेळाडू भारतीय वरिष्ठ संघाचे एकदिवस नक्की नेतृत्त्व करेल, अशा शक्यता अनेक क्रिकेट तज्ञांनी त्यावेळी वर्तवली होती. परंतु चंदला पुढे देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी सामन्यातही म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्याची अ दर्जाच्या सामन्यातील कामगिरी मात्र थोडीफार बरी राहिली आहे.
याच खेळाडूची दिल्लीतील त्याचा वरिष्ठ सहकारी विराट कोहलीशी अनेकवेळा तुलना होत होती. परंतु चंदला १९ वर्षाखालील विश्वचषकातील कामगिरीत पुढे सातत्य राखता आले नाही. दिल्ली डेअरडेविल्स, मुंबई इंडियन्स व राजस्थान राॅय़ल्स अशा तीन आयपीएल संघाकडून तो खेळला तसेच भारतीय संघाची दारे उघडणाऱ्या इंडिया अ संघाकडूनही त्याने क्रिकेट खेळले. परंतु त्याला म्हणावे असे यश आले नाही.
साल २०१० ते २०२० या काळात चंद ६७ प्रथम श्रेणी सामने खेळला असून त्यात त्याने ३१.५७च्या सरासरीने ३३७९ धावा केल्या आहेत. तर अ दर्जाच्या १२०सामन्यात ४१.३३च्या सरासरीने त्याने ४५०५ धावा केल्या आहेत. २०२० हंगामात चंद उत्तराखंडकडून क्रिकेट खेळला व त्यातही त्याला मोठे अपयश आले आहे. १४ डावात ४१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली. आयपीएलमध्येही चंदला २०११ ते २०१६ या काळात जेमतेम २१ सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने १५च्या सरासरीने ३०० धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
–१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
–घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
–दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय
–आणि झाली शिखर धवनची लव्हस्टोरी सुरु
–भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?
–माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?