कोणत्याही क्रिकेटपटूचे मोठे स्वप्न असते की त्याने एक ना एक दिवस आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाची जर्सी घालावी. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूचे ध्येय कोणत्या ना कोणत्या मार्गाने राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचे असते. जेव्हा कोणत्याही क्रिकेटपटूला राष्ट्रीय संघात संधी मिळते आणि त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच तो सामनावीराचा पुरस्कार पटकावतो, तेव्हा त्याच्यासाठी आकाश ठेंगणे झालेले असते. भारतीय क्रिकेट संघात असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी हे अद्भुत काम केले आहे.
भारताच्या टी-२० क्रिकेट इतिहासात आतापर्यंत अनेक खेळाडूंनी पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीराचा किताब पटकावण्याचा चमत्कार केला आहे. यापैकी काही गोलंदाजही आहेत, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच चमकदार कामगिरी करून सामनाविराचा किताब पटकावला. या लेखात, आम्ही अशा पाच भारतीय गोलंदाजांचा उल्लेख करणार आहोत, ज्यांनी त्यांच्या पदार्पणाच्या टी-२० मध्ये सामनावीराचा किताब जिंकला.
प्रज्ञान ओझा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझाने तिन्ही प्रकारात क्रिकेट खेळण्यात यश मिळवले आहे. प्रग्यान ओझाला २००९ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत प्रग्यान ओझा याने बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळला होता. या सामन्यात भारताने १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशला १५५ धावांवर रोखले होते. बांगलादेशी फलंदाजांविरुद्ध ओझाने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने ४ षटकात २१ धावा देऊन ४ फलंदाज बाद केले होते. या कामगिरीसाठी त्याला पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
अक्षर पटेल
भारताचा सध्याचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यानेही आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. अक्षर पटेलला २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली होती. अक्षर पटेलने या सामन्यात चार षटकात केवळ १७ धावांवर ३ फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीमुळे अक्षर पटेलला हा पुरस्कार मिळाला.
बरिंदर सरन
पंजाबचा वेगवान गोलंदाज बरिंदर सरनलाही भारताकडून खेळण्यात यश मिळाले होते. त्याने आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला होता. सरनने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने १० धावांत ४ विकेट्स मिळवल्या होत्या. झिम्बाब्वेला ९९ धावांवर रोखण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
नवदीप सैनी
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने पदार्पणाच्या सामन्यातच आपल्या कारकिर्दीला शानदार सुरुवात केली होती. नवदीप सैनीने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. या सामन्यात नवदीप सैनीने जबरदस्त गोलंदाजी करत ४ षटकांत १७ धावा देत तीन बळी घेतले होते. वेस्ट विंडीज संघ ९५ धावांवर सर्वबाद झाला होता. त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सैनीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
हर्षल पटेल
भारतीय संघातील या चार खेळाडूंनंतर आता हर्षल पटेलने पदार्पणाच्या टी-२० सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा पराक्रम केला आहे. हर्षल पटेलला रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. हर्षलने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करत आपल्या ४ षटकांमध्ये २५ धावा देत २ बळी घेतले होते. या उत्कृष्ट कामगिरीसाठी हर्षल पटेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-ईडन गार्डन्सचे ‘अजोड’ नाते तुफानी अर्धशतकाने झाले आणखीन वृद्धिंगत
‘हिटमॅन’चं विश्वविक्रमी अर्धशतक! विराटला मागे टाकत ‘या’ यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर विराजमान
माईलस्टोन अलर्ट! भारताच्या युझवेंद्र चहलसाठी कोलकाता टी२० राहिली विक्रमी, केला ‘हा’ खास किर्तीमान