भारतीय संघाचे असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्या लग्नाव्यतिरिक्त दुसऱ्या प्रेमप्रकरणची चर्चा झाली होती. काहींनी प्रेमप्रकरणामुळे आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देखील दिला आहे. तर, काहींचे वैवाहिक जीवन नंतरच्या काळात संपले.
आज आम्ही तुम्हाला त्या ५ भारतीय खेळाडूंची नावे सांगणार आहोत ज्यांचे लग्नानंतरही प्रेमसंबंध होते.
१) सौरव गांगुली
सन २००० मध्ये सौरव गांगुली आणि बॉलिवूड अभिनेत्री नगमा यांच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली. त्यावेळी नगमा व सौरव गांगुलीशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या जात. तेव्हा, असे मानले जात होते की, नगमा आणि सौरव गांगुली यांच्यात बऱ्याच काळापासून अफेअर सुरू आहे.
त्यावर्षी, सौरव गांगुली आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट टप्प्यातून जात होता. बॉलिवूडमध्ये सुद्धा नगमाची जादू शिगेला पोहोचली होती.
दोघांच्या नात्याच्या चर्चा होत राहिल्या. परंतु, दोघांनीही ही गोष्ट माध्यमांसमोर कधीही स्वीकारली नाही.
२) मोहम्मद अझरुद्दिन
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनच्या दोन विवाहांबद्दल बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्याचे पहिले लग्न नौरिनशी झाले होते, त्यांना दोन मुलगे होते. परंतु, नंतर अझरचे बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत प्रेमप्रकरण सुरू झाले. १९९६ मध्ये संगीता बिजलानीशी लग्न करण्यासाठी त्याने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला.
२०१० मध्ये अझरुद्दीनचे नाव बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाशी जोडले गेले होते. त्याचवर्षी, अझरचा संगीता बिजलानीशी घटस्फोट झाला.
३) मोहम्मद शमी
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने मोहम्मद शमीवर इतर मुलींशी अवैध संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच, मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचार आणि खूनाचा प्रयत्न सारखे गंभीर आरोप लावले होते.
हसीन जहांने शमी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध कोलकाता येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी हसीन जहांने मोहम्मद शमीचे इतर महिलांशी केलेल्या कथित संवादांचे अनेक स्क्रीनशॉट्स समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले होते.
४) जवागल श्रीनाथ
माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने पहिल्यांदा ज्योत्स्नाशी लग्न केले होते, परंतु माधवी पतरवली या पत्रकाराशी लग्न करण्यासाठी तिला घटस्फोट दिला. श्रीनाथ व माधवीने २००८ मध्ये लग्न केले. पहिले लग्न असूनही माधवीशी श्रीनाथचे प्रेमसंबंध होते.
२००३ च्या विश्वचषकात जवागल श्रीनाथने भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. त्या विश्वचषकात भारताच्या सलग ८ विजयांमध्ये मोठे योगदान दिले. श्रीनाथने भारतीय संघासाठी ६७ कसोटी सामने आणि २२९ एकदिवसीय सामने खेळले. श्रीनाथने कसोटी सामन्यात २३६ आणि वनडेमध्ये ३१५ बळी घेतले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर श्रीनाथ मॅच रेफरी म्हणून काम पाहतो.
५) विनोद कांबळी
१९९३ ते २००० या काळात भारतीय संघात खेळलेला डावखुरा फलंदाज विनोद कांबळी त्याच्या कौशल्याने महान खेळाडू बनू शकला असता, परंतु सततच्या वादांमुळे त्याची कारकीर्द अधुरीच राहीली.
विनोद कांबळी तसाही मैदानाबाहेरच्या कथांसाठी प्रसिद्ध होता. कांबळीने १९९८ मध्ये आपली बालपणातील मैत्रिण नोएला लुईसशी लग्न केले होते, परंतु नंतर त्याचे मॉडेल एंड्रिया हेविटशी प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे, दोघांनी लग्न केले.