बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि विराट कोहली (Virat kohli)यांच्यातील वाद अलिकडच्या काही दिवसांमध्ये शांत झाला होता. पण तितक्यातच सौरव गांगुली पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. गांगुली संघाच्या निवड समितीच्या बैठकीत सहभागी झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार बीसीसीआय अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत सहभागी होऊ शकत नाहीत. आता याच संदर्भात निवड समितीच्या एका अधिकाऱ्याकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे.
निवड समितीच्या अधिकाऱ्यांच्या मते गांगुलींने निवड प्रक्रियेत कधीच प्रत्यक्ष हस्तक्षेप केला नाही, पण त्यांची बैठकीतील उपस्थितीच भितीदायक असते. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने इनसाइडस्पोर्ट्सने सांगितले की, “जे आहे ते आहे. तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकत नाही, हो ना? त्यानी (सौरव गांगुली) निवड प्रक्रियेत दखल दिली आहे का? तर नाही. त्यांनी कधिच तसे केले नाही. परंतु त्यांची उपस्थितीच भितीदायक आहे. कारण ते बीसीसीआय अध्यक्ष आहेत. मी याविषयी अधिक काही बोलू शकत नाही.”
अलिकाडच्या काही दिवसांमध्ये माध्यमांतील वृत्तांमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, सौरव गांगुली निवड समितीच्या बैठकीत जबरदस्ती सहभागी होतात. पाहायला गेले, तर त्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचा काहीच संबंध नाहीय. यसंदर्भात इनसाइड स्पोर्ट्ने जेव्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा वेगवेगळी उत्तरे मिळाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा सर्व बातम्या खोट्या आहेत. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे या बातम्या खऱ्या आहेत. एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की, गांगुली एक दोनदा नाही तर अनेकदा निवड समितीच्या बैठकीत सहभागी झाले आहेत.