मुंबई: आघाडी-पिछाडीच्या अभूतपूर्व खेळानंतर पेटून उठलेल्या मुंबई बंदराने बलाढ्य एअर इंडियाचे आघाडीवर असलेले विमान जमीनीवर उतरवत आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्याच साखळी लढतीत 51-43 असा विजय नोंदवला.
तसेच मध्य रेल्वे, महाराष्ट्र पोलीस आणि बलाढ्य भारत पेट्रोलियमने देखण्या विजयासह आपले विजयी अभियान सुरू केले.
प्रभादेवीच्या मुरारी घाग मार्गावर चवन्नी गल्लीत सुरू झालेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेने आज सारा परिसर कबड्डीमय झाला होता.
माहिम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकारामुळे प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा क्र. 194 यांनी संयुक्त आयोजित केलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेने पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय लौकिकाला साजेसं आयोजन करून सर्वांचीच वाहवा मिळविली.
विशेष म्हणजे स्पर्धेचा उद्घाटनीय सामना नियोजित वेळेनूसार 6 वाजता सुरू झाला. उद्घाटनीय सामना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी रंगतदार लावणी प्रसिद्ध नृत्यांगना वर्षा दर्पे यांनी सादर केली.
मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आमदार सदा सरवणकर, आयोजक आणि नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
मुंबई बंदरची कमाल
एअर इंडिया आणि मुंबई बंदर यांच्यात खेळला गेलेला सामना खऱया अर्थाने चढउतारांचा सामना होता. शिवराज जाधव आणि गणेश डेरंग यांच्या जोरदार चढायांनी एअर इंडियावर लोण चढवत बंदराला पहिल्या दहा मिनीटातच 15-10 अशी आघाडी मिळवून दिली होती.
तेव्हाच एअर इंडियाच्या उमेश म्हात्रेच्या एका चढाईने सामन्याचा सारा चेहरा बदलून टाकला. त्याने एकाच चढाईत मैदानात असलेले चारही खेळाडू बाद करून बंदरवर अनपेक्षितपणे लोण चढवला. या चढाईमुळे पिछाडीवर असलेली एअर इंडिया मध्यंतराला 24-17अशी आघाडीवर पोहोचली.
उत्तरार्धाचा खेळ सुरू होताच तिसऱया मिनीटालाच त्यांनी आणखी एक लोण चढवत बंदरवर 28-20 अशी जबरदस्त आघाडी मिळवली. हा गुणफलक पाहताच एअर इंडियाचा विजय निश्चित वाटत होता. फक्त त्यांना संयमी खेळाची गरज होती. पण सामन्याने पुन्हा एकदा रंग दाखवला. 22-31 अशा पिछाडीवर असलेल्या बंदरच्या संघात जान आणली शिवराज जाधवच्या एका भन्नाट चढाईने.
त्याने एअर इंडियाच्या रक्षकांना चकवत टिपलेले 3 गुण स्फूर्तीदायक होते. या गुणांमुळे त्यांनी केवळ 31-31 अशी बरोबरीच साधली नाही तर लोणही लादला. त्यानंतर बंदराच्या चढाईबहाद्दरांनी आपल्या गुणांचा सपाटा कायम राखत सामन्यावर पकड मजबूत करण्यास सुरूवात केली.
तेव्हाच दिपक गिरीने 3 खेळाडू बाद करून पाच मिनीटांच्या कालावधीत संघाला आणखी एक लोण चढवून दिला. त्यानंतर आघाडीवर असलेल्या बंदरची आघाडी कमी करणे एअर इंडियाला शक्य झाले नाही आणि त्यांना 43-51 अशी 8 गुणांनी हार सहन करावी लागली. मुंबई बंदरच्या गणेश डेरंग आणि शुभम पुंभार यांनी अफलातून पकडींचा खेळ करून दाखवला.
भारत पेट्रोलियमचा जोरदार विजय
प्रो कबड्डीच्या स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारत पेट्रोलियमने आपली सलामी दणदणीत दिली. नितीन मदनेने प्रारंभीच एका खोलवर चढाईत युनियन बँकेच्या क्षेत्ररक्षणावर दरोडा घालत 4 गुण टिपले.
मग पुढच्याच मिनीटात आकाश मुंडेने दोन गडी बाद करीत युनियनवर लोण लादला. रिशांक देवाडिगासह खेळत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या खेळाडूंचा खेळ इतका जबरदस्त होता की दुसरा लोण चढवायला त्यांना फार वेळ लागला नाही.
15 मिनीटातच दुसरा लोण चढवत त्यांनी 19-2 अशी निर्णायक आघाडी घेतली होती. सामना पुर्णपणे एकतर्फी झाल्यामुळे प्रेक्षकांनी मध्यंतरापूर्वीच मैदानातून काढता पाय घेतला.
निरस आणि कंटाळवाण्या सामन्यात भारत पेट्रोलियमने मध्यंतरातील 24-9 अशा आघाडीनंतर 35-18 असा सहज विजय नोंदविला. मध्य रेल्वेने देना बँकेचे आव्हान 46-36 असे परतावून लावले.
रेल्वेच्या श्रीकांत जाधवने एका चढाईत टिपलेले चार गुण या सामन्याचे वैशिष्टय होते. गुरूविंदर सिंग आणि आतिश धुमाळ यांच्याही दमदार खेळामुळे रेल्वेने हा सामना कोणत्याही अडचणीविना जिंकला. देना बँकेकडून नितीन देशमुख आणि पंकज मोहिते यांनी चांगला खेळ केला.
महाराष्ट्र पोलीस आणि बँक ऑफ इंडिया यांच्यातील लढतही थरारक झाली. महेश मकदूम आणि महेंद्र राजपूत यांच्या वेगवान चढायांनी महाराष्ट्र पोलीसांना मध्यंतरालाच 18-8अशी दणदणीत आघाडी मिळवून दिली होती.
उत्तरार्धाच्या खेळात विराज उतेकर आणि सुरज सुतळे यांनी चांगला खेळ करून संघाचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सामना संपायला 7 मिनीटे असताना बँक ऑफ इंडियाने भन्नाट खेळ करीत 18-31 अशा पिछाडीवरून शेवटच्या मिनीटाला खेळ 31-34 असा आणला. पण त्यांची धडपड वाया केली आणि पोलीसांनी 35-31 अशी बाजी मारली.
कबड्डीप्रेमी बेहद्द खूश
या स्पर्धेत खेळाडूंबरोबर कबड्डीप्रेमींचीही काळजी घेत आयोजकांनी सर्वांसाठी पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. स्पर्धा कोणतीही असो, प्रेक्षकांकडे साऱयांचे दुर्लक्ष असते, पण प्रभादेवीत आयोजक समाधान सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रेक्षकांचीही काळजी घेण्यात आली.
असह्य उकाडा होत असताना पाणी आणि अल्पोपहराची मोफत व्यवस्था केल्यामुळे प्रेक्षक बेहद्द खूश होते. त्यांनी अप्रतिम आयोजनासाठी आयोजकांचे कौतुक करत आभारही मानले. एवढेच नव्हे तर शेवटच्या सामन्यापर्यंत कबड्डी खेळाचा आस्वाद लुटणाऱया चाहत्याला एक अत्याधुनिक सायकल बक्षीस रूपाने सोडतीद्वारे दिली गेली.
महत्त्वाच्या बातम्या –
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने